उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ चुका टाळा! Pudhari File Photo
विश्वसंचार

उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ चुका टाळा!

उष्माघाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ

पुढारी वृत्तसेवा

सध्या उन्हाळा अतिशय कडक बनला आहे आणि अशावेळी उष्माघाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते. जेव्हा एखाद्याला उष्माघात होतो, तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे त्या व्यक्तीला तीव्र डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, मळमळ, उलट्या होणे, अस्वस्थता, गोंधळ, हृदयाचे ठोके वाढणे, जलद श्वास घेणे, चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवू लागतात. ही लक्षणे दिसताच, बाधित व्यक्तीला आरामदायी तापमान असलेल्या मोकळ्या जागी बसवावे आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

उष्णतेवर मात करण्यासाठी, योग्य दिनचर्या पाळणे खूप महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा, तुमच्या स्वतःच्या चुका, जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केल्या गेल्या, तरी तुम्हाला उष्माघाताचा बळी बनवू शकतात. अशा परिस्थितीत काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, असे तज्ज्ञ सांगतात. उष्माघात ही अशी स्थिती आहे, जेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित नसते, म्हणजेच शरीर स्वतःला थंड ठेवू शकत नाही. या परिस्थितीला ‘हायपरथर्मिया’ असेही म्हणतात, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्वरित उपचारांची आवश्यकता असते, अन्यथा कधीकधी उष्माघात प्राणघातक ठरू शकतो. उष्माघाताची शक्यता वाढण्याची कारणे कोणती आहेत, ते जाणून घेऊया.

द्रवपदार्थ न पिणे :

उष्माघात टाळण्यासाठी, शरीर हायड्रेटेड राहणे खूप महत्त्वाचे आहे. बरेच लोकं कमी पाणी पितात, ज्यामुळे डिहायड्रेशन होते आणि उष्णतेमुळे शरीराचे तापमान लक्षणीयरीत्या वाढू शकते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. उन्हाळ्यात, भरपूर पाणी पिण्यासोबतच, बेलफळाचा रस, लिंबूपाणी, सत्तूचा रस, ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी इत्यादी द्रवपदार्थांचे सेवन करावे.

अल्कोहोल किंवा कॅफिनचे अतिसेवन :

अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीर डिहायड्रेट होते, ज्यामुळे उष्माघाताची शक्यता वाढते. याशिवाय, अल्कोहोलचे इतर अनेक गंभीर तोटे देखील आहेत. त्याचबरोबर उन्हाळ्यात कॅफिन म्हणजेच चहा आणि कॉफी कमी प्रमाणात सेवन करावे. काही लोकांना दिवसभरात जास्त चहा किंवा अनेक कप कॉफी पिण्याची सवय असते, ज्यामुळे तुम्ही उष्माघाताचा बळी ठरू शकता.

उन्हात काळजी न घेणे :

उष्माघात टाळण्यासाठी, गर्दीच्या वेळी बाहेर न जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घरातच राहावे. बर्‍याचदा लोकं बाहेर जाताना किंवा कडक उन्हात काम करताना, जसे की डोके न झाकणे, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. जर तुम्ही बाहेर जात असाल किंवा काही काम असेल, तर तुमचे डोके हलक्या रंगाच्या सुती कापडाने झाकून ठेवा. अधूनमधून विश्रांती घ्या आणि सावलीत जा. इलेक्ट्रोलाइट पावडर सोबत ठेवा आणि ते पाण्यात मिसळून प्या, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. यामुळे शरीर हायड्रेटेड देखील राहील.

कार्बोनेटेड पेये पिणे :

जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात खूप थंड पेये प्यायलात तर यामुळे उष्माघाताची शक्यता वाढते. अनेकांना असे वाटते की, कार्बोनेटेड पेये द्रव असतात आणि आराम देखील देतात. म्हणून लोकं विचार न करता ते पितात; परंतु यामुळे पाण्यासोबतच शरीरात इलेक्ट्रोलाइट देखील कमी होते. यामुळे इतर अनेक आरोग्य समस्यादेखील उद्भवू शकतात.

नाश्ता वगळणे :

रोजच्या कामाच्या धावपळीत लोकांच्या खाण्याच्या सवयीही खूप बिघडल्या आहेत. अनेकदा लोकं सकाळी कामावर जाण्याच्या किंवा कॉलेजला पोहोचण्याच्या घाईत नाश्ता वगळतात. यामुळे तुमच्या आरोग्याचे अनेक नुकसान होते आणि जर तुम्ही उन्हाळ्यात उपाशी राहिलात, तर उष्माघाताचा धोका वाढतो. जर तुम्हाला नाश्ता करता येत नसेल तर तुम्ही टरबूज, खरबूज, काकडी यांसारखी फळे कापून पॅक करू शकता आणि वाटेत खाऊ शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT