US-Israel Attack Iran
तेहरान/दुबई: मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील खामेनी यांच्या मुख्य कार्यालयावर भीषण हवाई हल्ला केला, या कारवाईने संपूर्ण जग हादरले आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पर्यटनासाठी गेलेले भारतीय नागरिक संकटात सापडले आहेत.
इराणमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेली भारतीय विद्यार्थिनी आयशाने हिने तिथल्या भीषण परिस्थितीचे वर्णन केले आहे. "येथे सध्या प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. दर १५ मिनिटांनी स्फोटांचे कानठळ्या बसवणारे आवाज येत आहेत," असे तिने सांगितले. जीव मुठीत धरून राहणाऱ्या आयशाने भारत सरकारला आपल्याला मायदेशी सुखरूप परत नेण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे.
दुसरीकडे, अहिल्यानगर शहरातील १० ते १२ नागरिक कामानिमित्त आणि पर्यटनासाठी दुबईला गेले होते, ते सध्या तिथेच अडकून पडले आहेत. बुरज खलिफा परिसरातील हॉटेलमध्ये हे नागरिक वास्तव्यास आहेत. एअरबेसवर हल्ले झाल्यामुळे विमानतळ बंद करण्यात आले असून अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. सर्व भारतीय नागरिक सुखरूप असून त्यांनी व्हिडिओद्वारे संदेश पाठवून आपल्या सुरक्षिततेची माहिती दिली आहे. ते सातत्याने भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत.