गडचिरोली: दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोरची तालुक्यातील खुणारा या गावातील तीन सख्या बहिणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस भरतीत घवघवीत यश मिळवले आहे. अश्विनी नूतन आणि पल्लवी कुमरे त्याचबरोबर आणखी एका बहिणीची पोलीस भरतीमध्ये निवड झाली आहे.
या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. घरात दारिद्र्य असतानाही वडिलांनी मुलींच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. "मी स्वतः बी.ए. पर्यंत शिकलो होतो, पण त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मला पुढे जाता आले नाही. मात्र, माझ्या मुलींनी शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे हीच माझी जिद्द होती," अशा भावना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केल्या.
एकाच घरातून तीन मुलींची पोलीस दलात निवड होण्याची ही जिल्ह्यातील दुर्मीळ घटना आहे. विशेष म्हणजे, यातील एका बहिणीने आपले शिक्षण बी.एड. पर्यंत पूर्ण केले असून, पोलीस दलात रुजू झाल्यानंतरही 'पी.एस.आय' होण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले.