सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेने आषाढी यात्रा कालावधीत 'हरित वारी' अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत पालखीमार्गावर दहा हजार वृक्षांचे रोपण वारकर्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वारकर्यांनी लावलेल्या झाडांचे जतन शेतकरी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा परिषदेत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गटविकास अधिकारी व 'उमेद' अभियानातील तालुका स्तरावरील समन्वयक यांच्या व्हीसी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
'माझी वसुंधरा'अंतर्गत दोन वर्षे विविध वृक्ष लागवड करण्यात आली आहे. विविध योजनांचा कृती संगम घालून आषाढीवारीत याबाबत नियोजन करण्यात येत आहे. पालखीमार्गांवर राष्ट्रीय महामार्गामुळे परिसरातील वृक्षांची संख्या कमी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालखीमार्ग हरित होण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे. पालखी मार्गांवरील 74 गावांत ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व गावांत व्यापक प्रमाणात मोहीम हाती घेण्यात येत आहे. वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करण्यात येत आहे.
25 जून ते 27 जून या कालावधीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे जनजागरण करणे, 27 जून ते 29 जून या कालावधीत निश्चित केलेल्या जागेवर वृक्षारोपण करणे, 29 जून ते 2 जुलै 2022 रोजी आवश्यक असलेली रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे यांनी सर्व भारतीय वृक्ष निवडून त्यांची लागवड करण्याच्या सूचना दिल्या. सध्या पालखीमार्गावर साफसफाई करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार खड्डे खोदून घ्या. बचतगटांचादेखील सहभाग घ्या. शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन झांडाचे नियोजन करा, असे आवाहन त्यांनी केले.