Uncategorized

तणाव कमी करण्यास सूर्यनमस्कार महत्त्वाचा

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : प्राणायाम व सूर्यनमस्कार नियमित केल्याने शरीरातील आजार कमी होतात. मानवी आयुष्यातील ताण तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम व सूर्यनमस्कार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन पतंजली योग समितीचे उत्तर कर्नाटक राज्य प्रभारी किरण मनोळकर यांनी केले. अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मैदानात क्रीडा भारती व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार व प्राणायामचे आयोजन केले होते.

प्रमुख पाहूणे म्हणून जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, ऑर्थोपेडिक डॉ. सुनील भांदुर्गे, क्रीडा भरती राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, भारत स्वाभिमान जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पटेल, पतंजली योग समिती जिल्हाध्यक्ष मोहन बागेवाडी, किसान सेवा समिती ज्योतिबा बादवानकर, अमरेंद्र कांगो, अशोक बेंनकर, श्वेता दीक्षित यांच्या हस्ते भारतमाता, हनुमान प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात अग्निहोत्राने झाली. यानंतर पाहुण्यांचा परिचय क्रीडा भारती उत्तर कर्नाटकचे सहमंत्री विश्वास पवार यांनी करून दिला. याप्रसंगी मोहन पत्तार, नामदेव मिरजकर, मयुरी पिंगट, ज्योती पवार, चंद्रकांत पाटील, हनुमंत पाटील, एच. बी. रुगी यांच्यासह क्रीडा भारतीचे खेळाडू उपस्थित होते.

या कार्यक्रमात संत मीरा, बालिका आदर्श, एम. आर. भंडारी, ठळकवाडी हायस्कूल, जी. जी. चिटणीस तसेच गोमटे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि अनगोळ रहिवासी व हास्य क्लबच्या सभासदानी भाग घेतला. सूत्रसंचालन परशराम मंगनाईक यांनी तर उमेश बेळगुंदकर यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT