Uncategorized

औरंगाबाद : जमिनीच्या वादातून शेतकर्‍याची आत्महत्या

मोहन कारंडे

पैठण / ढोरकीन, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील गेवराई बाशी येथील 70 वर्षीय शेतकर्‍याने शेतीच्या वादातून आत्महत्या केली. याप्रकरणी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपींना अटक करण्यातआली. घटनास्थळी मृताने लिहिलेली दोन पानांची सुसाईड नोट आढळली आहे. एमआयडीसी पोलिस, महसूल विभागाकडून योग्य न्याय मिळत नसल्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे शेषराव सोमाजी खुटेकर( वय 70) असे नाव आहे. याबाबत मृताचा मुलगा अरूण शेषराव खुटेकर ( ह. मु ,तळेगाव दाभाडे,पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई बार्शी ता. पैठण येथील शेषराव सोमाजी खुटेकर (वय 65 वर्ष) यांची शेती गट. नं.235 मध्ये साडेपाच एकर शेती असून ते या शेतीची वहीती व देखभाल करतात. गावातील शेतजमिनीवरून भावकीतील भाऊसाहेब खुटेकर व इतरांसोबत शेतीचा वाद पैठण न्यायालयात व तहसिल कार्यालय पैठण येथे चालू आहे. सदरील वाद हा गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे.भावकीतील काही जण त्यांना मानसिक त्रास देत जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. दि.24 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून शेषराव खुटेकर यांना मारहाण केली. मंगळवारी (दि.30) या लोकांनी जेसिबीसह ट्रॅक्टर आणुन शेतात अतिक्रमण केले. शेतीच्या वादावरून भावकीतील या लोकांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून बुधवारी (दि.31) सकाळी साडेसहा वाजता राहत्या घरी शेषराव खुटेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात भाऊसाहेब बापू खुटेकर, बन्सी बापू कुटेकर, मच्छिंद्र बापू खुटेकर, मनोज बन्सी खुटेकर, अशोक बन्सी खुटेकर, दीपक बन्सी खुटेकर, विकास भाऊसाहेब खुटेकर, रवींद्र रमेश खुटेकर,मिनाबाई रमेश खुटेकर, अर्चना रवींद्र खुटेकर, राणी विकास खुटेकर, सिंधुबाई मच्छिंद्र खुटेकर (सर्व रा. गेवराई बाशी ता.पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे हे करीत आहे. चिठ्ठीत पोलिस, कर्मचार्‍यांची नावे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत याप्रकरणात न्यान न दिल्याचे सांगत पोलिस अधिकार्‍यांह महसूल कर्मचार्‍यांची नावे लिहिली आहेत.याप्रकरणी पोलिसांनी या नावांची दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात आला.

SCROLL FOR NEXT