कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांनी नेहमी गजबलेल्या बिंदू चौकासह शहरातील बहुतांश भागात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. बिंदू चौक येथील पार्किंमध्ये सोमवारी भटक्या कुत्र्याने एका पर्यटकाच्या पायाचा लचका तोडला. या आठवडाभरात येथे कुत्र्यांनी तीन पर्यटकांना चावा घेतल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षतेमुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांबाबत घडलेल्या घटना पाहता मनपा प्रशासन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.
गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांची टोळकीच्या टोळकी पाहायला मिळतात. विशेष करून महिला व शाळकरी मुलांमध्ये याबाबतची भीती निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कुत्र्यांच्या निर्बीजीकरण केले जाते. मात्र, या मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढता उपद्रव रोखायचा कसा, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.