Uncategorized

औरंगाबाद : शिक्षक मुख्यालयी राहिले तरच मिळेल गुणवत्तापूर्ण शिक्षण : आमदार प्रशांत बंब

अमृता चौगुले

औरंगाबाद : जिल्हा परिषदांच्या 80 टक्के शिक्षकांनी मुख्यालयी वास्तव्य केले तरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळेल, असे गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले. 'झाले गेले विसरा आता गावांत रहा, मुलांवर चांगले संस्कार घडवा. तुमच्या अडचणी भागृहात मांडण्याचा प्रयत्नही मी करेन,' असे आवाहनही त्यांनी केले.

आ. बंब म्हणाले,' पंचायत राज्य समितीचा सदस्य या नात्याने काही जिल्ह्यांना भेटी दिल्या असता, 100 टक्के शिक्षक मुख्यालयी राहतात, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर आपण सर्वेक्षण करून घेतले असता, 80 टक्के शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे तसेच शिक्षकांनी बनावट कागदपत्रे तयार करून घरभाडे उचलल्याचेही आढळून आले. शिक्षकांना घरभाडे मिळते याचे मला दु:ख नाही. मात्र, त्यांनी मुख्यालयी वास्तव्य करणे गरजेचे आहे. मुख्यालयी राहिल्यानंतरच त्यांना विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांची ओळख होईल. त्यानुसार मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून त्यातून जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य अधिक सुलभ होईल.

अपडाउन करण्यातच शिक्षकांचे चार ते पाच तास जात असतील,तर ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल याचा शिक्षकांनी विचार करावा.' 'जिल्हा परिषदांचे सुमारे 20 टक्के शिक्षक मुख्यालयी राहतात. त्यांची मुलेही जिल्हा परिषदांच्या शाळेत शिकतात. इतर शिक्षकांनीही त्यांचे अनुकरण करावे असा सल्ला आपण विधिमंडळ अधिवेशनात दिला होता. शिक्षक संघटनांनी यावरून रान माजवले. अनेकांनी मला धमक्यांचे फोन केले. एका शिक्षक पत्नीने अर्वाच्च भाषा वापरली. गंगापूर कारखान्यात आपण गैरव्यवहार केल्याचा आरोप या महिलेने केला. वास्तविक उधार-उसनवारी करून मी कारखाना वाचविला. विरोधकांनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माहिती नसतानाही सवंग आरोप करणार्‍या या महिलेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे,' असेही आ. बंब यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT