Uncategorized

औरंगाबाद : पोलिस ठाणे उडवण्याची धमकी देणारा अटकेत

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : 'डायल 112" वर सलग चार कॉल करून 'आज एक पोलिस ठाणे उडवून देणार,' अशी धमकी देणाऱ्याला गुन्हेशाखा व सायबर पोलिसांनी काही वेळातच पकडले. असा कॉल केल्यावर पोलिस खरेच दखल घेतात का? हे पाहण्यासाठी कॉल केल्याची कबुली त्याने दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली.

शुभम वैभव काळे (23, रा. अण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळ, संजयनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो चिकलठाणा एमआयडीसीत एका कंपनीत कामाला असून, त्याचे शिक्षण नववीपर्यंत झालेले आहे. घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे. कंपनीत जाताना डायल 112 ची गाडी फिरताना दिसली. हे पोलिस नुसतेच गाडीत फिरतात की काही कामही करतात? हे तपासण्यासाठी त्याने लगेचच कॉल केला आणि नंतर मोबाइल बंद करून कंपनीत गेला.

'डायल 112 वर कॉल करा आणि पोलिस मदत मिळवा,' असे आवाहन पोलिस दलाकडून सतत केले जात आहे, परंतु त्यावर अनेकजण फेक कॉल करून आता पोलिसांच्या डोक्याला ताप देऊ लागले आहेत. शुभमने 29 ऑगस्ट रोजी सलग चार वेळा कॉल केल्याने राज्यातील पोलिस खडबडून जागे झाले होते. याची दखल दहशतवादविरोधी पथकानेही घेतली होती.

पोलिस ठाणे उडवून देण्याची धमकी देणारे कॉल आल्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दखल घेण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीही लगेचच शहरातील बॉम्बशोधक व नाशक पथकाला शहरातील पोलिस ठाण्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. क्रांती चौक, सिटी चौक, बेगमपुरा, जिन्सीसह प्रमुख 12 पोलिस ठाण्यांची तपासणी करण्यात आली. तसेच श्वानपथक ठाण्यात नेऊन सर्वत्र तपासणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT