दहिवडी : प्रतिनिधी
माण तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी गावे' पाणीदार करण्याचा' एकच नारा देत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान केले असून गावोगावी 'तुफान आलंया'चा गजर ऐकावयास मिळत आहे. काही गावात तर रात्री बारा वाजता श्रमदानास सुरूवात करण्यात आली.
माणचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी माणदेशी जनतेने कंबर कसली असून गावागावांत हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष पाणलोट कामे करत आहेत. गेल्या महिन्यापासून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने यांच्या उपस्थित ग्रामसभाचा धडाका सुरू होता. रात्री एक-एक वाजेपंर्यंत अधिकार्यांनी बैठका घेतल्या. सर्व ग्रामस्थ मतभेद विसरून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एकत्र आली. काही गावांनी लाखोंची लोकवर्गणी जमा केली. दुष्काळ हटवण्यासाठी तालुक्यातील उच्च पदावर असलेले अधिकारीही महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. प्रत्येक गावांनी डीप सीसिटी, सीसीटी, लूज बोल्डर, गॅब्रियन बंधारे, ओढा सरळीकरण व खोलीकरण, माती नाला बांध आदी कामांचे सर्वे करून प्रत्यक्षात कामांना सुरवात केली आहे.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अनेक गावात अगदी रात्री बारा वाजल्यापासुन सुरवात करून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी श्रमदान केले. आंधळी येथे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी टिकाव चालवून कामाचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील अबालवृद्ध उपस्थित होते. अनेक वर्षांपासून या दुष्काळाच्या झळा सहन करणारे ाणवासिय गावे पाणीदार करण्यासाठी हेवे-दावे , वाद-विवाद विसरून एका छताखाली आले असून वॉटर कप' जिंकण्याचा निर्धार केला आहे.
Tags : Workers Hurray , Declare Drought ,satara news