मुंबई : प्रतिनिधी
भाजपाने महापौर निवडणूकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेची लढाई सोपी झाली आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्याकडे असलाल्या स्थायी समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी जैसे थे ठेवत, मातोश्रीने अखेरच्या क्षणी वरळीच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
महापौर पदासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पण सकाळी भाजपाने महापौर निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करताच, जाधव यांचे नाव मागे पडले. तर, दुसरीकडे जाधव यांना महापौर पद देण्यात येऊ नये, यासाठी वरळीतील नगरसेवकांनी उठाव केला. त्यामुळे मातोश्रीवर तातडीची बैठक घेऊन, नगरसेवकांचे मत जाणून घेतले. अखेर किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वरळी विधानसभा निवडणुकीत पेडणेकर यांनी आदित्य ठाकरे यांना केलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांना महापौर पद देण्यात आल्याचे बोलले जात आहे.