हुपरी पुढारी वृत्तसेवा : सध्या कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यातच झाडे लावण्याची राष्ट्रीय पातळीवर मोहिम देखील सुरू आहे. अशा परिस्थितीत हुपरी यळगुड मार्गावर जवाहर साखर कारखान्याने रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या उलटा अशोक च्या झाडांमुळे या भागात निसर्गरम्य वातावरण होते. मात्र वीज मंडळाने पश्चिम बाजूच्या सुमारे 150 हून अधिक झाडांची कत्तल केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे, दोन दिवसापूर्वी अत्यंत विलोभनीय दिसणारा हा भाग भकास झाला आहे. गेली तीस वर्षे जवाहर कारखाना या झाडांचे संगोपन करीत आहे.
वाचा : एन. डी. पाटील यांची तब्बेत ठीक, ९२ व्या वर्षी कोरोनावरही मात
दरम्यान, हुपरी यळगुडकडे जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीला अडथळा नको म्हणून ही झाडे तोड्ल्याचे कळते. हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कल्लप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाशराव आवाडे यानी दूरदृष्टीतून हुपरी यळगुड रस्त्याच्या दुतर्फा आपल्या हद्दीत तीस वर्षांपूर्वी उलटा अशोकची एक हजारावर झाडे लावली आहेत. त्याचे अत्यंत नियोजनबद्ध संगोपन केल्यामुळे हा भाग कोकणात तरी नाही ना असा प्रश्न पडायचा.
या विलोभनीय दृश्यांमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर या भागात फोटोसेशनसाठी यायची. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या या झाडामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण होत होते. जवाहर कारखान्याचे प्रशासन दोन तीन वर्षानी झाडे दोन ते पाच फूटाने कटिंग करुन त्यांची निगा राखते. मात्र दोन दिवसापूर्वी वीज मंडळाच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून रस्त्याच्या पश्चिमेकडील 163 झाडे बुंध्यापर्यंत कापली आहेत. त्यामुळे हा भाग भकास दिसत असून नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.
वाचा : वस्तुसंग्रहालये : इतिहासाची जिवंत स्मारके
दरम्यान जवाहर कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मंडळाला आपण दोन चार फूट झाडे कटिंग करा असे सांगितले होते. मात्र काहीही न ऐकता पूर्ण झाडे बुंध्यापर्यंत कट केल्याचे सांगून याबाबत कोणतेही लेखी पत्र दिले नसल्याचे सांगितले.
दरम्यान, शेती अधिकारी किरण कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितल की, वीज मंडळाच्या संबधित पथकाला कारखान्याने आपली यंत्रणा दिली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ही झाडे बुंध्यापर्यंत तोडली. याचे खेद वाटत असल्याचे सांगितले.
दरम्यान, हुपरी यळगुडकडे उच दाबाची वीज वाहिनी गेली आहे. त्यामुळे अशोकाची झाडे त्या तारांना स्पर्श करीत होती. त्यामुळे झाडे तोड्ल्याचे समजते, मात्र पाच सहा फूट झाडे कटिंग केली असती तर चालले असते मात्र बुंध्यापर्यर्यंत ही झाडे कटिंग केल्यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे, याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
वाचा : आमदार आबिटकरांची राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड