मुंबई : पुढारी ऑनलाईन
अयोध्या येथील बाबरी मशिद व राम जन्मभूमी जमीन वादावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमीन रामलल्लाचीच असल्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. तसेच अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर पर्यायी जागा देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. या निर्णयाचे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे.
या निर्णयानंतर मुंबईसह महाराष्ट्रात शांततेचे आणि चांगले वातावरण असल्याचे सांगत त्यांनी याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. भारतील लोकशाहीच्या सर्वोच्च मुल्ल्यांना मजबूत करणारा हा आदेश आहे. हा आदेश म्हणजे कोणासाठी विजय अथवा पराजय नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे. या निर्णयाचे जवळजवळ सर्वांनी स्वागत केले आहे. आपल्याला विश्वास आहे महाराष्ट्रात जी काही परंपरा आहे त्याचे पालन करत सर्व लोक शांतता प्रस्तापित करतील. सर्व उत्सव उत्साहात, शांततेत साजरे करतील.
देशात भारतभक्तीचा भाव तयार झाला आहे. नवीन भारतात समलोक एकजुटीने या निर्णयाचा सन्मान करतील, अशा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाचे आपण मनपूर्वक स्वागत करतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.