जळगाव ; पुढारी वृत्तसेवा: पंजाब मेल या देशातील सर्वात जुन्या ट्रेनला १०९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ट्रेनने १ जून रोजी ११० व्या वर्षात पदार्पण केले. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात १ मे २०२० पासून विशेष गाड्या पुन्हा हळूहळू सुरू केल्या गेल्या. पंजाब मेल विशेष गाडी दि. १ डिसेंबर २०२० पासून एलएचबी कोचसह सुरू करण्यात आली. एलएचबी डबे प्रवाशांना अधिक सुरक्षा आणि सुखद प्रवासाचा अनुभव देत आहेत.
१ जून १९१२ पासून 'पंजाब मेल' सेवेत…
मुंबई ते पेशावर चालणा-या पंजाब मेलची सुरूवात खरे म्हणजे अस्पष्ट आहे. १९११ च्या अंदाजपत्रक कागदपत्राच्या आधारे आणि दि. १२ ऑक्टोबर १९१२ रोजी 'दिल्ली येथे यायला काही मिनिटांनी ट्रेनला उशिर झाले' याविषयी प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवर आधारित पंजाब मेलने दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटल्याचा (पहिल्यांदा सुरू झाल्याचा) अंदाज आहे.
वाचा : मुंबई : चोराशी झटापटीत लोकलखाली येऊन महिलेचा मृत्यू; तीन मुलींचं छत्र हरपलं
पंजाब मेल हि 'ग्लॅमरस फ्रंटियर मेल'पेक्षा १६ वर्ष अधिक जुनी आहे. बॅलार्ड पियर मोल स्टेशन खंर म्हणजे जीआयपी रेल्वे सेवांसाठी एक केंद्र होते. तेव्हा तिलापंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड, असे संबोधले जात होते. १ जून १९१२ रोजी ही मेल सुरू झाली. प्रारंभी, पी आणि ओ स्टीमर्स आणि वसाहती भारतात प्रथमच पोस्टिंग झालेले सरकारी अधिकारी त्यांच्या पत्नीसमवेत यामधून प्रवास करीत. साऊथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास १३ दिवस चालायचा. ब्रिटिश अधिकारी मुंबईला जाण्यासाठी तसेच त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी अंतर्देशीय रेल्वेने प्रवासासाठी एकत्रित तिकिटे घेत असत. त्यामुळे येथे आल्यावर ते मद्रास, कलकत्ता किंवा दिल्ली यापैकी एका रेल्वेगाडीने प्रवास करीत असत.
पंजाब लिमिटेड निश्चित टपालादिवशी मुंबईच्या बल्लार्ड पियर मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्गे सुमारे ४७ तासांत २४९६ किमी अंतर कापत असे. सुरुवातीला ट्रेनमध्ये सहा डब्यांचा समावेश होता. त्यात तीन डबे प्रवाशांसाठी आणि तीन डबे टपाल माल (टपालासाठी) होते. तीन प्रवासी डब्ब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त ९६ प्रवाशांची होती. सर्व डब्बे एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरिडॉर कार) होते आणि डबे प्रथम श्रेणीच्या, दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवले गेले होते. उच्च-श्रेणीतील प्रवाशांसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा असत. त्यामध्ये लॅव्हॅटरीज, बाथरूम, एक रेस्टॉरंट कार, सामानासाठी एक डबा आणि एक डबा गोर्या साहेबांच्या नोकरांकरीता असे.
वाचा : २४ तासांत २ लाख, ३१ हजार, ४५६ रुग्ण कोरोनामुक्त
फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन होती. तिचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरुन मोठ्या प्रमाणात जात होता आणि पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता. १९१४ पासून या ट्रेनचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि याची दैनंदिन सेवा सुरू झाली. मुख्यत: उच्च वर्गाच्या गो-या साहेबांच्या सेवेपासून पंजाब मेलने लवकरच निम्न वर्गातही सेवा पुरवायला सुरुवात केली.
१९३० च्या दशकाच्या मध्यापासून पंजाब मेलमध्ये तृतीय श्रेणीचे डब्बे जोडले गेले. १९१४ मध्ये मुंबई ते दिल्ली हा जीआयपी मार्ग सुमारे १५४१ किमीचा होता. हे अंतर ही ट्रेन २९ तास ३० मिनिटांत पूर्ण करीत असे. १९२० च्या दशकाच्या सुरूवातीस सुमारे १८ थांबे असूनही प्रवासाची वेळ कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आली.सन १९४५ मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डबा जोडण्यात आला. १९७२ मध्ये प्रवासाची वेळ पुन्हा २९ तासांपर्यंत वाढविण्यात आली. दि. १ मे १९७६ पासून पंजाब मेल डिझेल इंजिनासह धावू लागली. २०११ मध्ये पंजाब मेलला तब्बल ५५ थांबे होते.
थळ घाटाच्या विद्युतीकरणानंतर रेल्वे बॉम्बे व्हीटी ते मनमाड पर्यंत इलेक्ट्रिक इंजिनासह चालविण्यात येऊ लागली. तेथून पुढे हि मेल डब्ल्यूपी क्लास स्टीम इंजिनने येवू लागली. मनमाडपासून फिरोजपूरपर्यंत ही गाडी डब्ल्यूपीसह चालविण्यात येत होती. १९६८ मध्ये ही ट्रेन झांसीपर्यंत डिझेलवर चालविली जाऊ लागली. तसेच लोडिंग १२ पासून १५ डब्ब्यांपर्यंत वाढविले गेले.
डिझेलीकरणानंतर झांसी ते नवी दिल्ली, त्यानंतर १९७६ मध्ये फिरोजपूरपर्यंत ही पंजाब मेल गाडी धावू लागली. झाशी येथे दोन डब्यांची भर पडत डब्यांची संख्या १८ करण्यात आली.१९७० च्या उत्तरार्धात अथवा इ.स. १९८० च्या दशकाच्या पूर्वार्धात पंजाब मेल चालविण्यासाठी डब्ल्यूसीएएम/१ ड्युअल करंट लोकोमोटिव्ह इगतपुरी येथे डीसी ते एसी ट्रॅक्शन बदलून भुसावळपर्यंत इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालविले जात असे.
यानंतर पंजाब मेल मुंबई- फिरोजपूर कँटोन्मेंट दरम्यान १९३० किमीचे अंतर कापण्यासाठी ३४ तास आणि १५ मिनिटे घेत असे. ही ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनासह धावत असून आता रेस्टॉरंट कारची जागा पेंट्री कारने घेतली आहे. सध्या विशेष पंजाब मेलमध्ये एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १ पेंट्री कार, ५ सामान्य द्वितीय आसन श्रेणीचे डब्बे आणि एक जनरेटर व्हॅन आहे.