Uncategorized

कोरोना : राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार!

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुरूच असल्याने लॉकडाऊन १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. निर्बंधाच्या शेवटच्या दिवशी अंतिम निर्णय केला जाईल असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांतील रुग्णसंख्या किंचित घटली आहे. तथापि, नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा आलेख कायम चढता आहे. एकीकडे मुंबई, पुणे या शहरी भागातील रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा : राज्यातील १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर 

महाराष्ट्रात 12 फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मागील 10 आठवड्यांत म्हणजेच अडीच महिन्यांत महाराष्ट्रातील तब्बल 23 लाखांच्या घरात नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. सुरुवातीला ही लाट पुणे, मुंबईत आली. त्यानंतर ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहरांत वाढत गेली. आता मुंबई, ठाणे, पुण्यात रुग्णसंख्या घटू लागली आहे. मात्र नाशिक व नागपूरसह उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढ कायम आहे. पुणे, मुंबई, ठाणे शहर व परिसरातील रुग्णसंख्या कमी होण्यामागे अथवा लाट ओसरण्यामागे 14 एप्रिलपासून लावण्यात आलेली संचारबंदी, कडक निर्बंधाचा सकारात्मक परिणाम असल्याचे  बोलले जाते. कारण ही शहरे दाट लोकसंख्येची आहेत. लोकांची वर्दळ कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली असा प्राथमिक निष्कर्ष काढला जात आहे.

अधिक वाचा : राज्यात सरसकट मोफत लसीकरण

दुसरीकडे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा चढता आलेख कायम आहे. दिलासादायक बाब म्हणजे या दोन्ही शहरांतील रुग्णवाढीच्या दरात मागील आठवड्यापासून किंचित घट झाली आहे. त्यामुळे आगामी 10-12 दिवसांनंतर नाशिक आणि नागपूरमधील रुग्णसंख्या घटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर आदी पाच प्रमुख शहरे, जिल्हे वगळता उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात मार्चअखेरपर्यंत मर्यादित रुग्णसंख्या होती. मात्र एप्रिल महिन्यात ग्रामीण महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांत रुग्णसंख्या घटल्याने फायदा झाल्याचे दिसते, तर उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात याचा फायदा 10 ते 15 मेनंतर दिसेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अधिक वाचा : मासिक पाळी, स्तनपान करणाऱ्या, गर्भवती महिलांनी लस घ्यावी? सर्व प्रश्नाची उत्तरे एका ठिकाणी!

महाराष्ट्रातील दुसर्‍या लाटेतील रुग्णसंख्या व सद्यस्थिती पाहता राज्यात आणखी किमान 10 ते 12 दिवस लॉकडाऊनसदृश कडक निर्बंधांची गरज भासते. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यावेळी राज्यातील लसीकरण मोहिमेबाबत आणि कोरोना परिस्थितीबाबत भाष्य करणार आहेत. राज्याची सद्यस्थिती पाहून मुख्यमंत्री महाराष्ट्रात 10 मेपर्यंत कडक निर्बंध वाढविण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील दुसर्‍या लाटेचे सद्यस्थितीतील निष्कर्ष काय सांगतात?


महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट कायम, सध्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या स्थिर.


शहरी भागातील रुग्णसंख्येत घट, तर ग्रामीण महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वाढ कायम


मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतील मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या घटू लागली.


सिरो सर्व्हेत मुंबईत 40 टक्के लोकांची प्रतिकारशक्‍ती मजबूत. याचाच अर्थ या शहरांतील नागरिकांत सामूहिक प्रतिकारशक्‍ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झाल्याने लाट ओसरत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज. कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम व फायदा झाल्याचा सरकारी स्तरावरून दावा.


नाशिक, नागपूर जिल्ह्यांत रुग्णवाढ कायम. राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय.


मुंबई, ठाणे, पुणे वगळता नाशिक आणि नागपूर या शहराभिमुख जिल्ह्यांसह उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात रुग्णवाढ कायम.


राज्यात 6 लाख 75 हजार सक्रिय रुग्ण. शहरी भागांतील मृत्युदर अर्धा टक्के, तर ग्रामीण भागातील 1 टक्के. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती.


 राज्यातील पाच प्रमुख शहरांत 60 टक्के रुग्ण


   दुसर्‍या लाटेतील महाराष्ट्रातील रुग्णसंख्या : 22 लाख 90 हजार 822


   दुसर्‍या लाटेतील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्या : 13 लाख 69 हजार 306. (राज्यांच्या एकूण रुग्णसंख्येच्या 60 टक्के)


   दुसर्‍या लाटेतील उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रातील रुग्णसंख्या : 9 लाख 21 हजार 516. (राज्यांच्या एकूण रुग्णसंख्येच्या 40 टक्के)

SCROLL FOR NEXT