ंगळवेढा : तालुका प्रतिनिधी
रत्नागिरी- नागपूर या महामार्गाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू असून यात महामार्गासाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. अशा शेतकर्यांना अद्यापही तांत्रिक बाबी दाखवून जमिनीचा मोबदला दिलेला नाही. त्यामुळे भूसंपादन झालेले बाधित शेतकरी सध्या अस्वस्थ आहेत. याप्रश्नी प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत त्यांचा मोबदला न मिळाल्यास 25 नोव्हेंबरपासून मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
रत्नागीरी-नागपूर महामार्गासाठी गेल्या वर्षभरापासून भूसंपादन प्रक्रिया सुरू असून यातील काही शेतकर्यांना भूसंपादन मोबदला देण्यात आला आहे. मात्र, अनेक शेतकर्यांच्या भूसंपादनाबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे शेतकर्यांनी आपले संबंधित तक्रारी अर्ज प्रांताधिकार्यांना दिले. त्यानंतर ज्याच्या शेतकर्यांच्या अडचणी असतील अशा शेतकर्यांच्या अडचणी कार्यालयीन विभागातून सोडविण्याबाबत शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे आवश्यक असताना याबाबत उचित कार्यवाही होत नसल्याचे शेतकर्यांमधून बोलले जात आहे.
अशात ज्यावेळी वर्तमानपत्रातून भूसंपादन बाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी हरकती घेण्याबाबत कालावधी देण्यात आला होता. त्या कालावधीनंतर हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असतानाही काही हरकती या नव्याने गेल्या चार महिन्यांत दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकती विचारात घेण्यात आल्याने अनेक शेतकरी त्यांच्या मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या मालकीच्या असलेल्या शेतात सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ता निर्मितीचे काम सुरू आहे. याबाबत अनेक शेतकर्यांनी वेळोवेळी हे काम थांबविण्याबाबत प्रांताधिकार्यांना भेटून विनंती केली. मात्र, यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने रस्ते निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. अनेक बाधित शेतकर्यांनी कार्यालयाकडे भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, मोबदला देण्यात येत नाही, कार्यालयाकडून अडचणी सांगितल्या जात आहेत. ते लेखी स्वरूपात देण्याबाबत विनंती केली असता कार्यालयाकडून त्या शेतकर्यांना कोणतेही लेखी पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे बाधित शेतकर्यांत संभ्रमाची अवस्था आहे. याबाबत जिल्हाधिकारी व वरिष्ठ पातळीवरील संबंधित विभागाने शेतकर्यांना लवकरात लवकर न्याय देणे आवश्यक आहे.