Uncategorized

वारणा काठी ऊसउत्पादनात घट | पुढारी

Pudhari News

बागणी : प्रतिनिधी

वारणा काठावर महापूर आणि  त्यानंतर सतत सुरू असलेली अतिवृष्टी याचा शेतीला, विशेषत: ऊसपिकाला मोठाच फटका बसला आहे. यावेळी तयार उसाचे या सार्‍या भागात उत्पादन घटण्याचीच भीती आहे. महापूर, अतिवृष्टी पाठोपाठ ऊसउत्पादनातील घटीची भीती यामुळे शेतकर्‍यांची तिहेरी कोंडी झाली आहे. दरम्यान, ऊस कमी असल्याचे यावेळी उसाची पळवापळवी रंगण्याचीच शक्यता आहे. दर जादा मिळेल, अशी ऊसउत्पादकाला आशा  आहे.

वारणा भागात प्रामुख्याने राजारामबापूनगर कारखान्याचे साखराळे आणि कारंदवाडी युनिट, विश्वास, सोनहिरा, वारणा, बांबवडे आदी  साखर कारखान्यांकडून  उसाची उचल केली जाते. तसेच कृष्णा, उदगिरी, सांगली आदी कारखान्यास देखील मोठ्या प्रमाणात ऊस जातो. मात्र या वर्षी झालेल्या पावसामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

या सार्‍या भागात वारणा काठी उपसा योजनांचे जाळे आहे. तसेच वैयक्तिक उपसा योजना देखील मोठ्या संख्येने आहेत.  बागणी, शिगाव, फार्णेवाडी, ढवळी, कोरेगाव, बहादूरवाडी, नागाव, भडकंबे आदी सार्‍या भागात तब्बल 15 हजार एकराहून अधिक उसाचे क्षेत्र आहे.  सततचा पाऊस आणि महापुरात बुडाल्याने उसाचे एकरी उत्पादन घटणार आहे.

ऑगस्टमध्ये भागात महापूर, अतिवृष्टीमुळे गंभीर स्थिती झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे आणि शेतीचे फार मोठे नुकसान झाले.  महापुराचे पाण्याने  खरीप पीक पूर्णपणे वाया गेले. परतीच्या पावसामुळे  ऊस पिकांत  पाणी साचून राहिल्याने पिकाची  वाढ पूर्णपणे बंद झाली. 

उसउत्पादक नुकसानीच्या गर्तेत

यावर्षी मुसळधार पावसामुळे ऑगस्टमधील  महापूरस्थितीचा शेतीला सामना करावा लागला.  त्यामुळे यावेळी  आडसाली लागणीला याचा मोठा फटका सहन करावा लागला.  अनेक ठिकाणी आडसाली लागणींना सरासरीपेक्षा फुटवा कमी आला, तर उसाची वाढ चांगली झाली नाही. त्यामुळे पुढील वर्षीही ऊस उत्पादन घटणार असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT