पुणे : प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)चा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा सीबीएसईचा बारावीचा निकाल ८३.०१ टक्के इतका लागला. या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून यावर्षी तब्बल ८८.३१ टक्के मुली उतीर्ण झाल्या आहे. मेघना श्रीवास्तव हीने ५०० गुणांपैकी ४९९ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सीबीएसईच्या बारावीच्या निकालात यावर्षी मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णांची टक्केवारी तब्बल ८८.३१ टक्के एवढी आहे. तर मुलांची उत्तीर्णांची टक्केवारी ७८.९९ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मुलीच आहेत. या परीक्षेत नोएडाच्या मेघना श्रीवास्तव हिने ४९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अनुष्का चंद्रा हीने ४९८ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच चाहत बोधराज ४९७ गुण मिळवून तिसर्या क्रमांकावर राहिली आहे. दिव्यांगांमध्ये ४९२ गुण मिळवून विजय गणेश प्रथम आला आहे. तर पूजा कुमारी ४९८ गुण मिळवत दुसरी आली आहे.
गेल्यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल ८२.०२ टक्के लागला होता. यावर्षी जवळपास एक टक्क्यांनी वाढ झाली असून यंदा ८३.०१ टक्के एवढा निकाल लागला आहे. यामध्ये त्रिवेंद्रम विभागाचा सर्वात जास्त म्हणजे ९७.३ टक्के एवढा निकाल लागला आहे. त्यानंतर चेन्नईचा ९३.८७ आणि दिल्लीचा ८९ टक्के निकाल लागला आहे.
देशातील ४ हजार १३८ परीक्षा केंद्रावर; तर परदेशातील ७१ केंद्रांवर ५ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. एकूण ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८३.१ टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.