Latest

कोल्हापूर : त्रिसदस्यीय प्रभाग रचना शक्य

Arun Patil

कोल्हापूर ; सतीश सरीकर : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यसंख्या कमी करण्याचा निर्णय नुकताच घेतला. कोल्हापूर शहरातील लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 81 झाली आहे. प्रभाग रचनेविषयी अद्याप स्पष्टता नाही. परंतु, यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

81 नगरसेवकांसाठी 27 प्रभाग होऊ शकतील. कारण, यापूर्वी महापालिका प्रशासनाने सरकारच्याच निर्णयानुसार 81 नगरसेवकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार त्रिसदस्यीय प्रभाग रचना तयार करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, पुन्हा ती प्रक्रिया रद्द झाली होती.

भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना 19 मे 2016 रोजी राज्य सरकारने बहुसदस्यीय पद्धतीसाठी आदेश काढला होता. राज्यातील सर्व महापालिकांत एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश काढून नियमात दुरुस्ती करण्यात केली होती. परंतु, 2019 ला राज्यात सत्ताबदल झाला.

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आदेश 2020 मध्ये रद्द केला होता. मात्र, पुन्हा काही महिन्यांनी महाविकास आघाडी सरकारनेच बहुसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात सर्वत्र बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धती अंमलात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, 7 ऑक्टोबर 2021 रोजी महापालिकेची प्रभाग रचना त्रिसदस्यीय अन् नगरसेवकांची संख्या 81 करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने निवडणूक प्रक्रियासुद्धा पार पाडली होती. आता पुन्हा 81 नगरसेवक आणि बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे.

महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, डिसेंबर 2020 मध्ये एक प्रभाग रचनेनुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. आरक्षण सोडत काढून मतदारयाद्याही तयार झाल्या होत्या. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला.

त्यानंतर पुन्हा नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 92 होऊन प्रभाग रचना त्रिसदस्यीय करण्यात आली आहे. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग व 2 नगरसेवकांचा 1 असे 31 प्रभाग तयार केले आहेत. परंतु, आता राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या 81 आणि पूर्वीप्रमाणेच प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाने केलेल्या 92 नगरसेवक आणि 31 प्रभाग रचनेवर पाणी फिरले आहे.

इच्छुकांची 'झाकली मूठ सव्वा लाखाची…'

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी करत आहेत. 2020 मध्ये निवडणुका लागतील, या हिशेबाने खर्चही करत होते. तरुण मंडळ, तालीम संस्था, कार्यकर्त्यांना आपल्याकडे राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसांची उधळण होत होती. परंतु, निवडणूक लांबत गेली आणि इच्छुकांचा खर्चही वाढत गेला. लवकरच निवडणुका होतील, या अपेक्षेने इच्छुक हात सैल सोडत होते. मात्र, काहीही झाले तरी निवडणूक होईना. कोणत्या न् कोणत्या कारणाने निवडणुकीला स्थगिती किंवा निर्णयात बदल होत असल्याने अद्याप निवडणूक पार पडलेली नाही.

गेली दोन वर्षे खर्च करून इच्छुक अक्षरशः घाईला आले आहेत. आता निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच पुन्हा संभ—मावस्था निर्माण झाली आहे. त्यातच आता गणेशोत्सवाबरोबरच इतर सण-उत्सव आले आहेत. मंडळांकडून मागण्यात येणार्‍या देणग्या आणि इतर खर्चाने इच्छुकांवर डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. परिणामी, निवडणुका जाहीर होत नाहीत, तोपर्यंत इच्छुकांनी 'झाकली मूठ सव्वा लाखाची' अशी भूमिका घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT