Latest

अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढतेय; चक्रीवादळांसह, पश्चिम किनारपट्टीलाही धोका

मोहन कारंडे

पणजी; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढत आहे, त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी काही वर्षांत तीव्र चक्रीवादळे निर्माण होतील व पश्चिम किनारपट्टीवर होणारा विध्वंस प्रचंड असेल. त्यासाठी आत्तापासूनच किनारपट्टीवरील राज्यांनी व्यवस्थापनासाठी सज्ज व्हायला हवे, असा इशारा समुद्रशास्त्रज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशनोग्राफीचे (एनआयओ) माजी संचालक डॉ. एस. प्रसन्नाकुमार यांनी दिला आहे.

एनआयओने गुरुवारी कोची येथे आयोजित केलेल्या हवामान बदलावरील राष्ट्रीय कार्यशाळेत अरबी समुद्राचे जलद तापमान वाढ आणि पूर्वेकडील सीमारेषेवरील अपवेलिंग आणि हिवाळ्यातील संवेदनाचे मॉड्युलेशन या विषयावर सादरीकरण करताना डॉ. प्रसन्नाकुमार यांनी हा अंदाज व्यक्त केला. सध्याच्या घडीला समुद्राचे तापमान 300 मीटरवर वाढले आहे. उत्तर अरबी समुद्र खूप खडकाळ आहे आणि त्याचा परिणाम येत्या दोन-तीन दिवसांत दिसून येईल आणि त्यानंतरच्या काळात अरबी समुद्रात आणखी तणावपूर्ण चक्रीवादळ पाहायला मिळणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत हा बदल दिसून येईल. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर प्रचंड हाहाकार माजेल. त्यासाठी आतापासूनच किनारपट्टीवरील राज्यांनी हव्या त्या पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्यात, असे सांगून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण 4 : 1 होते, परंतु आता ते 2 : 1 इतके बदलले आहे. त्यामुळे परिस्थिती भयावह ठरणार आहे, असे डॉ. प्रसन्नाकुमार यांनी सांगितले. अरबी समुद्रातील पृष्ठभागाचे तापमान 1995 पासून हेक्टरने धोकादाय पद्धतीने वाढत आहे. आता समुद्र जास्त उष्णतेत आहे, त्यामुळे 300 मीटर खोलीपर्यंत पाण्याचे जलद तापमान वाढले आहे. समुद्रात अडकलेली अतिरिक्त उष्णता ही मुख्य यंत्रणा आहे जी चक्रीवादळांना ढवळून काढते. त्यामुळे बाष्पीभवनाचा ताण वाढेल. वातावरणात तापमान वाढ होते व ढग फुटतात, त्यामुळे पूर येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रसन्नाकुमार यांनी 1960 ते 2022 या कालावधीत अरबी समुद्रातील उष्णतेचे प्रमाण आणि वादळे यासंबंधीचे एक संशोधन केले आहे. पॅसिफिक महासागर आणि लँटिक महासागराच्या उष्णतेपेक्षा अरबी समुद्राची उष्णता जास्त आहे. बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे तापमान अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे, त्यामुळे तेथे वारंवार चक्रीवादळे येतात. पण ती परिस्थिती बदलत आहे. सायक्लोन ही समुद्राची अतिरिक्त उष्णता थंड करण्याची नैसर्गिक यंत्रणा आहे. ते 200 मीटर खोलीपर्यंत पाण्याचा स्तंभ मंथन करून थंड करेल, असे डॉ. प्रसन्नाकुमार पुढे बोलताना म्हणाले.

अरबी समुद्रात आणखी तीव्र चक्रीवादळे निर्माण होणार आहेत आणि येत्या दोन ते तीन वर्षांत हा बदल दिसून येईल. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर होणारा विनाश प्रचंड असेल. किनारपट्टीवरील राज्यांनी आत्तापासूनच त्यासाठी सज्ज राहावे.
– डॉ. एस प्रसन्नाकुमार, समुद्रशास्त्रज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT