Latest

WTC गुणतालिकेत भारताची सहाव्या क्रमांकावर घसरण, बांगला देश; पाकिस्तान टीम इंडियाच्या पुढे

रणजित गायकवाड

दुबई, वृत्तसंस्था : भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 1 डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी पाचव्या स्थानावर असलेली टीम इंडिया आता सहाव्या स्थानावर आली आहे. पहिल्या कसोटीत भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. विशेष म्हणजे बांगला देश आणि पाकिस्तानही भारताच्या पुढे आहेत.

मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ या विजयासह तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी या तीन सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानी संघाचे मोठे नुकसान झाले आहे. शान मसूदचा संघ सध्याच्या क्रमवारीत दुसर्‍या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

भारताला दुहेरी झटका

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आयसीसीने स्लो ओव्हर रेटचा दंड आकारून भारताला दुहेरी झटका दिला आहे. टीम इंडियाच्या स्लो ओव्हर रेटमुळे, दोन डब्ल्यूटीसी पॉईंटस् कमी झाले आहेत. ज्यामुळे भारत ताज्या डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलमध्ये 6 व्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका या यादीत शीर्षस्थानी आहे. तर न्यूझीलंड काहीही न करता दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे.
डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. डब्ल्यूटीसी या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ दुसर्‍या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया तिसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे बांगला देश चौथ्या क्रमांकावर असून पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. भारत सहाव्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिज सातव्या स्थानावर आणि इंग्लंड आठव्या क्रमांकावर असून श्रीलंकेचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीला सिडनीमध्ये खेळला जाणार आहे, तर त्याच दिवसापासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरचा शेवटचा कसोटी सामनाही खेळणार आहे. या दोन्ही सामन्यानंतर डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलवर मोठा प्रभाव पडणार आहे.

डब्ल्यूटीसीमध्ये गुण कसे मिळतात?

सामना जिंकल्यास संघाला 12 गुण दिले जातील. सामना बरोबरीत राहिल्यास 6 गुण मिळतील, सामना ड्रॉ झाल्यास 4 गुण आणि संघ पराभूत झाल्यास कोणतेही गुण मिळणार नाहीत. सामना जिंकल्यावर 100 गुण, टाय झाल्यावर 50, ड्रॉ झाल्यास 33.33 आणि पराभव झाल्यावर कोणतेही गुण मिळणार नाहीत. गुणांच्या टक्केवारीच्या आधारे संघ ठरवले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT