स्टमक फ्लू किंवा गॅस्ट्रोएन्टेरायटिस याला आंत्रशोष असेही म्हणतात. पचनसंस्थेत संसर्ग आणि सूज आल्याने होणारा स्टमक फ्लू हा आजार आहे. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या पोटात पेटके येतात, जुलाब आणि उलटी होणे यासारख्या तक्रारी उद्भवतात. स्टमक फ्लूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला अतिसार आणि डायरियादेखील होऊ शकतो. अलीकडील काळात आहारातील बदलांमुळे पोटाशी निगडीत समस्या वाढत असल्याचे दिसून येते. पोटाशी संबंधित आजारांमध्ये एक महत्त्वाचा आजार म्हणजे स्टमक फ्लू. त्यालाच गॅस्ट्रोएन्टेरायटिस म्हणतात. पोटाचा हा आजार पचनसंस्थेला आलेल्या सुजेमुळे किंवा पोटात झालेल्या संसर्गामुळे होतो. अर्थात, हा आजार लवकर बरादेखील होतो; मात्र दुर्लक्ष केल्यास हा आजार धोकादायक ठरू शकतो.
स्टमक फ्लू हा विषाणू, जीवाणू तसेच काही परजीवी आणि रसायने किंवा औषधे यांची प्रतिक्रिया म्हणूनही होतो. स्टमक फ्लू म्हणजे काय? स्टमक फ्लू किंवा गॅस्ट्रोएन्टेरायटिस याला आंत्रशोष असेही म्हणतात. पचनसंस्थेत संसर्ग आणि सूज आल्याने होणारा हा आजार आहे. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या पोटात पेटके येतात, जुलाब आणि उलटी होणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात. स्टमक फ्लूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला अतिसार आणि डायरियादेखील होऊ शकतो. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस, एस्ट्रोव्हायरस इत्यादी विषाणू बहुतांश वेळा दूषित जेवण किंवा पिण्याच्या पाण्यात सापडतात. हे विषाणू जेवणातून किंवा पाण्यातून शरीरात शिरकाव करतात आणि 4 ते 48 तासांत शरीरात संसर्ग पसरवतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. बर्याच प्रकरणांमध्ये काही दिवसांनंतर आरोग्य सुधारते, बरे वाटू लागते.
वातावरण बदलांमुळे आजारांचे जीवाणू वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. या वातावरणात कापलेली फळे, भाज्या तसेच इतरही पदार्थ लवकर खराब होतात. माश्या, डास हे जीवाणू एका खाद्यपदार्थांवरून दुसरीकडे जातात. त्यामुळे असे अन्न सेवन केल्याने ते शरीरात प्रवेश करतात आणि व्यक्ती आजारी पडते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे दूषित पाणी. दूषित पाण्यानेही हा आजार फैलावू शकतो.
अचानक भूक कमी होते, पोटात वेदना होतात, डायरिया होऊ शकतो.
पोटात मळमळण्याचा त्रास होतो. उलटी आणि ताप येतो. रुग्णाला थंडी वाजते.
त्वचेची जळजळ होते. अतिघाम येऊ लागतो. याखेरीज सांधे कडक होणे, स्नायूंमध्ये त्रास होणे, वजन कमी होणे ही याची लक्षणे आहेत.
स्टमक फ्लू झाल्यास द्रवरूप पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. त्याशिवाय ओआरएसचे पेय या आजारात जरुर सेवन करावे. कारण, सतत उलट्या आणि जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होते. अनेकदा व्यक्तीची परिस्थिती बिघडते अशा वेळी व्यक्तीला रुग्णालयात भरती करावे. या परिस्थितीत डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधाचे सेवन करू नये.
या रोगापासून वाचण्यासाठी घरातील स्वच्छ ताजे अन्न सेवन करावे. शिळे अन्न आणि दूषित पाणी यांचा वापर करू नये. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. शौचाला जाऊन आल्यावर न विसरता हात साबणाने धुतले पाहिजेत. याखेरीज पाणी चांगल्या प्रकारे उकळून थंड करून मग प्यावे. वॉटर प्युरिफायर किंवा पाणी स्वच्छ करणारे उपकरणही लावू शकता. विहीर, हँडपंप यांच्या आसपास पाणी जमा होऊ देऊ नका. फळे, भाज्या सर्व धुवून वापरल्या पाहिजेत. गॅस्ट्रोएन्टेरायटिस पासून आपला बचाव होऊ शकतो; मात्र आहार आणि पाणी यांची स्वच्छता जरुर बाळगली पाहिजे.
डॉ. प्राजक्ता पाटील