मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्याला मान्यता दिली. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात 16 लाख मेट्रिक टन घट येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 105 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले. यंदा 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी
दिले. ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले.
गेल्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गाळप घेतले आहे. 105 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन 88.58 लाख मेट्रिक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम 2022-23 मध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक आहे.