स्पोर्ट्स

विजय श्रीलंकेचा, फायदा भारताचा ; पाकिस्तान कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर

Shambhuraj Pachindre

गाले : श्रीलंकेने दुसर्‍या कसोटीत पाकिस्तानवर 246 धावांनी विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या पराभवामुळे पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे, परंतु टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे.

भारतीय संघ अजून सहा कसोटी सामने खेळणार आहे. बांगलादेश दौर्‍यावर दोन, तर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार असे सहाही कसोटी सामने जिंकून भारताला अंतिम फेरीत पुन्हा प्रवेश मिळवण्याची संधी आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या पहिल्या पर्वात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

श्रीलंकेने गुणतालिकेत पुन्हा तिसरे स्थान पटकावले आहे. पाकिस्तान तीनवरून पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचे चौथे स्थान कायम आहे. गुणतालिकेत श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 53.33 आहे आणि त्यांचे एकूण 64 गुण आहेत. त्याचवेळी अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 71.43 आहे. ऑस्ट्रेलिया 70 टक्क्यांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना दक्षिण आफ्रिकेकडे गुणतालिकेत अव्वलस्थान कायम राखण्याची सुवर्णसंधी आहे. भारत 52.08 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज सहाव्या, इंग्लंड सातव्या, न्यूझीलंड आठव्या स्थानी आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT