स्पोर्ट्स

भारतीय महिला संघाला रौप्यपदक

Shambhuraj Pachindre

पॅरिस : वृत्तसंस्था दीपिका कुमारी, सिमरनजित कौर आणि अंकिता भकत या भारतीय महिला रिकर्व्ह त्रिकुटाचा तिरंदाजी विश्‍वकरंडकाच्या रविवारी झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत चायनीज तैपेईच्या संघाकडून 1-5 असा पराभव झाला. त्यामुळे त्यांना या स्पर्धेच्या तिसर्‍या टप्प्याच्या अंतिम दिवशी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

चायनीज तैपेईच्या लेई चियान-यिंग, पेंग चिया-माओ आणि कुओ त्झू यिंग या त्रिकुटाने तिसर्‍या सेटमध्येच सामना संपवताना 168-153 अशा एकतर्फी फरकासह विजय मिळवला. चायनीज तैपेईने पहिला सेट 56-53 ने जिंकला; तर 13 व्या मानांकित भारतीयांनी दुसरा सेटमध्ये 56 गुण घेताना बरोबरी साधण्यासाठी दोन गुणांचा दावा केला. तैपेईच्या त्रिकुटाने मात्र तिसर्‍या सेटमध्ये सातत्य राखताना 56-53 असे गुण घेत 1-5 अशी अभेद्य आघाडी घेतली आणि सुवर्णपदक जिंकले.

गेल्या 24 तासांच्या अंतरात भारताचे हे तिसरे पदक होते; कारण याआधी भारताने कंपाऊंड तिरंदाजांनी मिश्र सांघिक आणि महिला वैयक्‍तिक अंतिम फेरीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले होते. पुढे ढकलण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आल्यापासून पुनरागमनाच्या मार्गावर असणारी ज्योती सुरेखा वेन्‍नम चांगल्या फॉर्ममध्ये परतली आहे; कारण तिने प्रथम अभिषेक वर्मासोबत सुवर्णपदकासह नंतर महिलांच्या वैयक्‍तिक अंतिम फेरीत रौप्यपदक पटकावून आपली चुणूक दाखवली आहे.

भारत दुसर्‍या स्थानावर

सहा सुवर्णांसह पदकतालिकेत अव्वल असलेल्या पॉवरहाऊस दक्षिण कोरियानंतर, भारत आपल्या तीन पदकांसह दुसर्‍या स्थानावर आहे. तथापि, ग्रेट ब्रिटनने आता भारताच्या सुवर्णसंख्येशी बरोबरी साधली आहे, केवळ भारताच्या एकूण 9 पदकांमुळे ते तिसर्‍या स्थानावर आहेत, दक्षिण कोरियाचीही एकूण पदकसंख्या 9 इतकी आहे. तिरंदाजी विश्‍वकरंडकाचा चौथा टप्पा पुढील महिन्यात कोलंबियामध्ये होणार आहे, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मेक्सिकोत विश्‍वकरंडकाची अंतिम फेरी पार पडणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT