स्पोर्ट्स

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा 81 खेळाडूंचा संघ

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : 15 ते 21 जुलैदरम्यान मालदीव येथे होणार्‍या 54 व्या आशियाई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचा 81 खेळाडूंसह 115 जणांचा चमू सज्ज झाला आहे. स्पर्धेत आशियातील 22 देशांचे 500 पेक्षा अधिक दिग्गज खेळाडू सहभागी होत असून या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून भारतीय संघाची गणना होत आहे. भारत किमान वीस पदके जिंकेल, असा द़ृढ विश्वास भारतीय शरीरसौष्ठव संघाच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी बोलून दाखविला.

या स्पर्धेत यतिंदर सिंग, अनुज तालियान, आशिष मान, हरीबाबू आणि महेंद्र चव्हाणसारखे एकापेक्षा एक असे दिग्गज शरीरसौष्ठवाच्या विविध गटांत उतरणार आहेत. या खेळात यंदा भारताच्या महिलांचीही ताकद दिसेल.

भारतीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 20 पेक्षा अधिक महिला खेळाडू उतरत असल्याची माहिती शेठ यांनी दिली. यात प्रामुख्याने निशरीन पारीख, मंजिरी भावसार, आदिती बंब, भाविका प्रधान, कल्पना छेत्री, गीता सैनी, अंकिता गेन यांचा समावेश आहे.

भारताच्या जम्बो पथकाला खुद्द भारतीय शरीरसौष्ठवाचे आदर्श असलेले प्रेमचंद डेगरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच अध्यक्ष टी. व्ही. पॉली, प्रशिक्षक आरसू आणि व्यवस्थापक विश्वास राव हेसुद्धा असतील. गतवर्षी ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त यश संपादताना 22 पदकांची कमाई केली होती.

SCROLL FOR NEXT