पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला टी-20विश्वचषक स्पर्धेत ( Women's T20 World Cup 2024 ) टीम इंडियाने बुधवारी (दि.१०) श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवला. या विजयाने या स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राहिले आहे. मात्र आता भारतीय महिला संघाचा पुढील सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आहे. त्यामुळे सेमी फायनलमध्ये (उपांत्य फेरी) धडक मारण्यासाठी या सामन्यात भारतासाठी विजय अनिवार्य आहे. जाणून घेवूया टीम इंडिया सेमी फायलनमध्ये पोहचण्यासाठीचे समीकरण...
महिला टी-20विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होता. या सामन्यात ५८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला. मात्र रनरेटवर संघ पिछाडीवरच राहिला होता.
बुधवारी श्रीलंकेविरुद्धच्या T20 विश्वचषकात धावांच्या फरकाने आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. सलामीवीर स्मृती मंधानाच्या अर्धशतकाने विजयाचा पाया रचला गेला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळवणारी भारतीय फलंदाज ठरण्याची कामगिरीही केली. शफाली वर्मा देखील महिला T20I मध्ये 2000 धावा करण्याचा टप्पा गाठणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७२/३ धावा केल्या. यानंतर अवघ्या १९.५ षटकांमध्ये श्रीलंका संघाला ९० धावांत गुडाळले. या मोठ्या विजयामुळे त्यांना त्यांचा NRR सुधारण्यात मदत झाली, जी -1.271 वरून +0.576 वर गेली आहे. त्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे.
ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन थेट सेमी फायनलमध्ये धडक मारणे
भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी सहा गुण होतील. अशा वेळी गुणतालिकेत शीर्ष दोन संघांपैकी ज्यांचा नेट रन रेट चांगला असेल तेच दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तिन्ही संघाचा विचार करता सध्या न्यूझीलंड (-0.555) तर भारत (+0.576) आणि ऑस्ट्रेलिया (+2.524) रनरेट आहे.
... तर थेट स्पर्धेतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे टी-20 रेकॉर्डचा विचार करता २००८ पासून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३४ पैकी केवळ सात सामने जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. आता महिला टी-20विश्वचषक स्पर्धेतील ग्रूप सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्या हा संघ ८ गुणांसह सेमी फायनलमध्ये धडक मारेल. तर भारताला चारच गुणांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे थेट स्पर्धेतून बाहेर पडण्याचाही धोका कायम असेल.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभव झाला तरच...
ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यास टीम इंडियाच्या नावावर गुणतालिकेत ४ गुण असतील;पण पाकिस्तान आणि श्रीलंका सारख्या संघांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तरच भारताला सेमी फायनलसाठी पात्र ठरु शकतो.