T20 World Cup 2026 India Semi Final Scenario: वेस्टइंडीजच्या दणदणीत विजयामुळे सुपर-8 मधील ग्रुप-1 चं गणित बदललं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेस्टइंडीजने झिम्बाब्वेवर तब्बल 107 धावांनी मात करत गटात अव्वल स्थान पटकावलं आहे आणि याच निकालामुळे भारताची सेमीफायनलची वाट आणखी खडतर झाली आहे.
वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करत 254/6 अशी प्रचंड धावसंख्या उभारली. शिमरॉन हेटमायरची झंझावाती खेळी आणि रोव्हमन पॉवेलच्या वेगवान अर्धशतकामुळे कॅरेबियन संघाने सामना एकतर्फी फिरवला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे टार्गेटच्या दबावाखाली कोसळला. गोलंदाज गुडाकेश मोतीने चार विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या मोठ्या फरकाच्या विजयामुळे वेस्टइंडीजचा नेट रनरेट गटात सर्वोत्तम झाला.
या निकालानंतर ग्रुप-1 मध्ये वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांचे प्रत्येकी दोन गुण आहेत, मात्र चांगल्या रनरेटमुळे वेस्टइंडीज पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर, तर पहिलाच सामना गमावलेल्या भारताचा नेट रनरेट निगेटिव्हमध्ये गेल्याने संघ तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. झिम्बाब्वे तळाशी आहे.
भारत आधीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाला आहे. आता उरलेले दोन्ही सामने झिम्बाब्वेविरुद्ध आणि वेस्टइंडीजविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकणं हीच टीम इंडियासाठी खरी कसोटी आहे. कारण केवळ विजय पुरेसा नाही; नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे.
समीकरण 1: पहिला पर्याय असा आहे की, दक्षिण आफ्रिकेने उरलेले दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे सहा गुण होतील. अशा वेळी भारताने दोन्ही सामने जिंकून चार गुण मिळवले आणि रनरेट वेस्टइंडीजपेक्षा चांगला ठेवला, तर दुसऱ्या क्रमांकावरून सेमीफायनल गाठता येईल.
समीकरण 2: दुसरी शक्यता अशी आहे की, वेस्टइंडीजने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यास (आणि भारताने दोन्ही सामने जिंकल्यास) भारत, वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका तीन्ही संघांचे चार-चार गुण होतील. तेव्हा अंतिम निकाल नेट रनरेटवर ठरणार. इथेच भारतासमोर सर्वात मोठं आव्हान आहे, कारण पहिल्या सामन्यातील मोठ्या पराभवाने रनरेटला मोठा फटका बसला आहे.
भारताचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे आणि त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका वेस्टइंडीज आमनेसामने येणार आहेत. या दोन सामन्यांचे निकालच ग्रुप-1 ची दिशा जवळपास निश्चित करतील. थोडक्यात सांगायचं तर वेस्टइंडीजच्या या प्रचंड विजयामुळे टीम इंडियावरचा दबाव प्रचंड वाढला आहे. आता प्रत्येक सामना ‘करो या मरो’चा असणार आहे.