Wankhede Pitch Report IND vs ENG: आज (दि. ५ मार्च) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे. हा यंदाच्या टी २० वर्ल्डकपमधील दुसरा सेमी फायनल सामना आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा सहज पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यासाठी वानखेडेची खेळपट्टी कशी असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. या खेळपट्टीवर थोडं हिरवं गवत ठेवलं आहे. यामुळं कोणत्या संघाचा फायदा होईल आणि किती धावा होतील याबाबत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी आपलं मत व्यक्त केलं.
वानखेडेची खेळपट्टी ही पारंपरिकरित्या फलंदाजांना पोषक असते. याची छोटी बाऊंड्री मोठी धावसंख्या उभारण्यास मदत करते. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाकडे ताडेखाबाज फलंदाजी करणारे अनेक फलंदाज आहेत. त्यामुळं सेमी फायनल सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉर्ने मॉर्कलच्या मते जरी खेळपट्टीवर हिरवं गवत असलं तरी हा सामना हाय स्कोरिंगच होण्याची शक्यता आहे.
या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. याच मैदानावर अभिषेक शर्मानं एका वर्षापूर्वी धडाकेबाज शतक ठोकलं होतं. जर अभिषेकने त्याच धाटणीची फलंदाजी केली तर त्याचा भारतीय संघाला मोठा फायदा होऊ शकतो.
वानखेडेवर होणाऱ्या सेमी फायनलसाठी ७ क्रमांकाचे पीच निश्चित करण्यात आलं आहे. हे पीच मैदानाच्या मध्यभागी असल्यानं दोन्ही बाजूला बाऊंड्री एकसारखीच असणार आहे. या खेळपट्टीचा वापर इंग्लंडच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात करण्यात आला होता. त्यावेळी वेस्ट इंडीजनं इंग्लंडला मात दिली होती. नेपाळ आणि इटली सामन्यात देखील याच खेळपट्टीचा वापर करण्यात आला होता. मात्र १२ फेब्रुवारीपासून या खेळपट्टीचा वापर झालेला नाही. त्यामुळं ही एक फ्रेश खेळपट्टी असणार आहे.
या खेळपट्टीवर चांगलं गवत आहे. मुंबईमध्ये दमट हवामान असतं. सध्याचं वातावरण पाहता आणि दोन्ही संघातील फलंदाज पाहता २०० पेक्षा जास्त धावासंख्या होण्याची शक्यता दाट आहे. या खेळपट्टीवर चेंडू चांगला उसळी घेण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर फिरकीला तितकी साथ मिळण्याची शक्यता नाही.
इंग्लंडने टी २० वर्ल्डकपमध्ये यापूर्वी भारताचा ५ वेळा सामना केला आहे. यात सलग सेमी फायनल सामन्यांचा देखील समावेश आहे. भारताने २०२४ मध्ये इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. हेड टू हेडमध्ये भारत ३-२ ने आघाडीवर आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत कोणताही संघाने सलग दोन सामने जिंकलेले नाहीत.
एकूण टी २० ची आकडेवारी पाहिली तर आकडे भारताच्या बाजूने आहेत. आतापर्यंत इंग्लंडने १२ टी २० सामने जिंकले आहेत तर भारतानं १७ सामन्यात विजय मिळवला आहे. यातील सात विजयापैकी ६ विजय हे घरच्या मैदानावर मिळवले आहेत.