पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli on Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 27 निष्पाप लोक मृत्युमुखी पडले आणि 17 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या दहशतवादी हल्ल्यावर भारत आणि विदेशातील लोक संतापाने प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.
विराटने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. कोहलीने त्याच्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर मी खूप दुःखी झालो आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. सर्व पीडितांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे.’
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने मोठ निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान खेळाडू काळ्या पट्ट्या बांधतील. तसेच सामन्यादरम्यान चीअरलीडर्सचे सादरीकरण आणि फटक्यांची आतषबाजी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
शुभमन गिलने पहलगाममधील हल्ल्याची घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे.
युवराज सिंगनेही दुःख व्यक्त केले आणि पहलगाममधील पर्यटकांवर झालेला हल्ला खूप त्रासदायक आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी अशी त्याने भावना व्यक्त केली आहे.