पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Retirement : टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून भारतीय संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या सादरीकरणात कोहलीने हा आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे जाहीर केले. एकप्रकारे त्याने निवृत्तीचे संकेत देऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण 34 धावांत पहिले 3 विकेट गमावले. पण विराट कोहलीने 59 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 76 धावांची शानदार खेळी केली. त्याच्यासह अक्षर पटेल (47), शिवम दुबे (27) यांच्या खेळीमुळे भारताने 176 धावांपर्यंत मजल मारली.
फायनलपूर्वी विराट कोहली अतिशय खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याने 7 डावात फक्त 75 धावा केल्या, जे कोणत्याही भारतीयाने कोणत्याही टी20 विश्वचषकात किमान 75 चेंडू खेळून केलेली सर्वात कमी धावसंख्या होती. मात्र, फायनलमध्ये त्याने आपल्या सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
भारताने 11 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि अत्यंत रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील अधुरे स्वप्न अखेर वेस्ट इंडिजमध्ये पूर्ण झाले. तेव्हा रोहित शर्माच्या संघासह टीव्हीसमोर बसलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचे डोळे भरून आले होते. या आयसीसी विजेतेपदासाठी 11 वर्षांची प्रतीक्षा होती आणि या विजयाचा नायक विराट कोहली ठरला, ज्याने विजयासोबतच टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला. भारताने 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते.