पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishabh Pant IPL 2025 : बीसीसीआय लवकरच आयपीएल 2025 साठी रिटेन्शन पॉलिसी जाहीर करणार आहे. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. मात्र तरीही चाहते नव्या रिटेन्शन पॉलिसीवर लक्ष ठेवून आहेत, कारण त्यानंतर संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतात हे ठरणार आहे. दरम्यान, काही खेळाडूंना कायम ठेवण्याबाबतही विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियावर फेक न्यूजही व्हायरल होत आहेत. ऋषभ पंतबाबतही अशीच एक बातमी समोर आली आहे, ज्याला भारताच्या स्टार विकेटकीपरने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आयपीएल 2025 रिटेन्शन पूर्वीच, सोशल मीडियावर सूत्रांच्या हवाल्याने अनेक बातम्या पसरवल्या जात आहेत. जे निव्वळ बनावट आहेत. अशीच एक बातमी समोर आली आहे की ऋषभ पंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी म्हणजेच आरसीबीशी पुढील आयपीएल हंगामात खेळण्यासाठी संपर्क करत आहे. मात्र, पंतने ही फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहण्यास बजावले आहे.
एका चाहत्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून म्हटलंय की, ऋषभ पंतने कर्णधार होण्यासाठी आरसीबीशी संपर्क साधला होता, परंतु आरसीबी व्यवस्थापनाने त्याची विनंती स्वीकारली नाही. एवढेच नाही तर विराट कोहलीला पंत संघात नको असल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
यानंतर ऋषभ पंतने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंतने आरसीबीशी संपर्क केल्याचा दावा फेटाळला आहे. तथाकथित स्त्रोतांकडून पुन्हा चौकशी करण्याचीही त्याने मागणी केली आहे. पंत म्हणाला, ‘तुम्ही लोक सोशल मीडियावर एवढ्या खोट्या बातम्या का पसरवता? समजूतदार व्हा. विनाकारण असे वातावरण निर्माण करू नका. कृपया तुमच्या तथाकथित सूत्रे नेहमी तपासा. बाकी सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे. हा सल्ला चुकीची माहिती पसरवणाऱ्या अनेक लोकांसाठी आहे.’
ऋषभ पंत सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. अलीकडेच क्रिकबझच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे की पंत डीसीचा टॉप रिटेन्शन पर्याय बनण्यास तयार आहे. पंत पहिल्या सत्रापासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. आधी तो खेळाडू म्हणून खेळत होता, पण आता तो कर्णधार आहे. पुढील हंगामातही तो त्याच संघाचा कर्णधार राहील, अशी अपेक्षा आहे. पंतची भारतीय संघात एंट्री आयपीएलमध्ये खेळल्यानंतरच झाली.