pcb declare pakistan super league 2025 postponed indefinitely
दुबई : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाच्या शिखरावर आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, नौशेरा, सांबा उधमपूर आणि पठाणकोट यासह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडत शत्रू देशाचे मनसुबे उधळून लावले. दरम्यान, भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचीही प्रतिमा डागळली असून संयुक्त अरब अमिराती (UAE)ने PSL च्या आयोजनाच्या मागणीला लाथडले आहे. युएईच्या या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडावर आपटले आहे.
भारतासोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षानंतर PCB आणि फ्रँचायझी संघांनी PSLचे उर्वरीत सामने UAE मध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या परवानग्या आणि तांत्रिक कारणांमुळे UAE ने माघार घेतली. यामुळे PCB च्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. पीसीबीने याबाबत एक पत्रक जारी केले आहे. यात म्हटलेय की, ‘पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार पीएसएल 2025 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे खोटे म्हणणे पीसीबीने मांडून स्वत:ची झालेली बेअब्रू झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.
या नाट्यमय घडामोडीमुळे पाकिस्तान क्रिकेटच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. आता PSL च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नव्या यजमानदेशाच्या शोधासाठी बोर्ड धावपळ करत आहे. जगभरातील लीग स्पर्धा यशस्वीपणे पार पडत असताना, पाकिस्तान मात्र अजूनही स्थिरतेच्या शोधात भटकतो आहे. एकीकडे भारताची IPL जगावर राज्य करत आहे. तर दुसरीकडे PSL मात्र सामन्यांचे ठिकाणही शोधू शकत नाही, ही बाब PCB साठी लाजीरवाणीच ठरते.