T2O World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T2O World Cup 2026: तीन खेळाडूंमुळे टीम इंडिया संकटात! ऐनवेळी धोका दिल्यामुळे वर्ल्ड कप हातातून जाणार? चाहते चिंतेत

T2O World Cup 2026: टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचली असली तरी फलंदाजीतील कमकुवतपणा हा चिंतेचा विषय ठरत आहेत. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने दबाव वाढत आहे.

Rahul Shelke

T2O World Cup 2026: टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताने ग्रुप टप्प्यातील चारही सामने जिंकत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री केली आहे. अमेरिका, पाकिस्तान, नामिबिया आणि नेदरलँड्ससारख्या तुलनेने कमी ताकदीच्या संघांविरुद्ध विजय मिळवून टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचली आहे.

पण आता खरी कसोटी सुरू होणार आहे. भारता समोर साउथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजसारखे धोकादायक प्रतिस्पर्धी उभे आहेत. त्यामुळे भारताला या संघाविरुद्ध खेळताना एक चूक महागात पडू शकते. मात्र संघातील काही खेळाडूंची कामगिरी अजूनही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. हे तीन खेळाडू भारताची ताकद बनण्याऐवजी सध्या संकट बनले आहेत.

अभिषेक शर्मा

जगातील स्फोटक टी-20 फलंदाज म्हणून ओळख असलेला अभिषेक शर्मा या स्पर्धेत अजूनही खाते उघडू शकलेला नाही, ही धक्कादायक बाब आहे. अभिषेक सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला. एका सामन्यात तो तब्येतीच्या कारणामुळे खेळू शकला नाही, पण ज्या सामन्यांत तो खेळला त्या सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली नाही. सुरुवातीलाच विकेट गमावल्याने संघावर दबाव येतो आणि पुढील फलंदाजांवर जबाबदारी वाढते.

तिलक वर्मा

मधली फळी संभाळण्याची जबाबदारी तिलक वर्मावर आहे. परिस्थितीनुसार डाव सावरायचा आणि गरज पडल्यास गती वाढवायची असं त्याच काम आहे. पण आतापर्यंत चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आहे. चार सामन्यांत त्याने 106 धावा केल्या आहेत, पण निर्णायक क्षणी बाद झाल्यामुळे संघाला अपेक्षित फायदा झाला नाही.

रिंकू सिंह

निवड समितीने शुभमन गिलऐवजी रिंकू सिंहवर विश्वास दाखवला होता. फिनिशर म्हणून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांत त्याने 27 चेंडूंमध्ये फक्त 24 धावा केल्या आहेत. शेवटच्या षटकांत संघाला धावा करुन देण्याची जबाबदारी त्याने नीट पार पाडली नाही.

भारताची गोलंदाजी तुलनेने स्थिर दिसत असली, तरी फलंदाजीतील या त्रुटी सुपर-8 मध्ये अडचणीच्या ठरू शकतात. साउथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांविरुद्ध दबावाच्या क्षणी चूक परवडणारी नाही. ग्रुप स्टेजमध्ये कमकुवत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मिळालेले विजय आता फारसे महत्त्वाचे नाहीत. सुपर-8 हा खरा टप्पा आहे. येथे संघातील प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका अचूक पार पाडावी लागणार आहे. अन्यथा दमदार सुरुवात करूनही भारताचं विजेतेपदाचं स्वप्न अर्धवट राहू शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT