Team India match winner bowler out of Afghanistan Test
मुल्लानपूर : सध्या संपूर्ण देशात आयपीएल २०२६ चा थरार शिगेला पोहोचला असून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाणार असून, त्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात परतणार आहेत. भारतीय संघ ६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार असून क्रीडाप्रेमींमध्ये या सामन्याबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे.
संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि 'मॅच विनर' जसप्रीत बुमराह या कसोटी सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अफगाणिस्तानविरुद्धच्या या कसोटी सामन्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या कसोटी मालिकेत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात विजयाचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरेल.
मात्र, 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, कामाचा ताण (Workload Management) लक्षात घेता निवड समिती जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी विश्रांती देऊ शकते. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे. आयपीएल दरम्यान निवडकर्त्यांचे सिराजच्या कामगिरीवर बारीक लक्ष आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कसोटीतील कामगिरी आतापर्यंत संमिश्र राहिली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून या सामन्यात विजय मिळवून दमदार पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल. फलंदाजीमध्ये ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांचा संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघात सध्या तिसऱ्या क्रमांकावर कोणाला संधी द्यायची, याबाबत निवड समितीमध्ये खलबते सुरू असल्याचे समजते. या जागेसाठी साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या युवा खेळाडूंच्या नावांचा गांभीर्याने विचार केला जात आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच होणाऱ्या या कसोटी सामन्यात भारतीय संघ कोणत्या नव्या रणनीतीने उतरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.