चेन्नई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात धमाकेदार लढत होणार आहे. चेन्नईत गुरुवारी (दि. २६) संध्याकाळी ७ वाजता रंगणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल होण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील या महत्त्वपूर्ण सामन्याची प्रतीक्षा आता संपत आली आहे. सुपर-८ मधील हा सामनाच ठरवणार आहे की, भारतीय संघ या विश्वचषकाच्या शर्यतीत टिकून राहणार की त्यांचे आव्हान संपुष्टात येणार. या पार्श्वभूमीवर भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलांचे वारे वाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, संघात किमान दोन बदल निश्चित मानले जात आहेत, मात्र अंतिम निर्णय कर्णधार सूर्यकुमार यादव परिस्थितीनुसार घेणार आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय सलामीवीरांची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. अभिषेक शर्मापासून इशान किशनपर्यंत सर्वच फलंदाज धावासांठी संघर्ष करताना दिसत आहेत. संजू सॅमसनला एका सामन्यात संधी मिळाली होती, मात्र तो चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाला.
आता संघ व्यवस्थापन अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन या तिघांनाही एकाच वेळी संधी देण्याचा विचार करत असल्याचे समजते. अशा स्थितीत अभिषेक आणि संजू डावाची सुरुवात करू शकतात, तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. इशान तिसऱ्या क्रमांकावर आल्यास तिलक वर्मा चौथ्या आणि कर्णधार सूर्या पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसतील.
या नवीन समीकरणामुळे 'फिनिशर' रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. रिंकूच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे तो काही काळासाठी संघाबाहेर होता, मात्र तो आता परतला आहे. परंतु, आकडेवारीचा विचार करता रिंकूला फलंदाजीसाठी खूपच कमी चेंडू मिळत आहेत आणि तो गोलंदाजीही करत नाही. त्यामुळे फलंदाजीतील संतुलन राखण्यासाठी डाव्या हाताच्या रिंकूऐवजी उजव्या हाताच्या संजू सॅमसनला पसंती दिली जाऊ शकते. यामुळे अव्वल फळीतील डाव्या हाताच्या फलंदाजांची गर्दीही कमी होईल.
संघातील दुसऱ्या बदलाबाबत बोलायचे झाले तर, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलचे पुनरागमन होऊ शकते. अक्षरने सुरुवातीच्या तीन सामन्यांत सहा बळी टिपले होते, तरीही त्याला अचानक संघाबाहेर ठेवण्यात आले. दुसरीकडे, सुंदरला दोन सामन्यांत संधी मिळूनही एकही विकेट घेता आलेली नाही. त्यामुळे फिरकी विभागाला बळकटी देण्यासाठी अक्षर पटेलला पुन्हा संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. असे असले तरी गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता टॉस होईल, तेव्हाच भारतीय संघाची अंतिम प्लेइंग इलेव्हन स्पष्ट होईल.