T20 World Cup Super 8 Rain Rule Explained  Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup Super 8: सुपर 8 मधील सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? काय आहे आयसीसीचे नियम?

T20 World Cup Super 8: टी-20 वर्ल्ड कप सुपर-8 मध्ये एखादा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जातो. निकाल लागण्यासाठी किमान पाच-पाच षटके टाकली जाणे आवश्यक आहे.

Rahul Shelke

T20 World 2026: टी-20 विश्वचषक आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. ग्रुप स्टेज संपल्यानंतर अवघ्या आठ संघांनी सुपर-8 फेरीत प्रवेश केला असून, पुढील प्रत्येक सामना अक्षरशः “करो या मरो” असा असणार आहे. ICC T20 World Cup 2026 मध्ये 20 संघांपैकी निवडक आठ संघ दोन गटांत विभागले गेले आहेत. प्रत्येक गटात चार संघ असून, प्रत्येक संघाला तीन सामने खेळावे लागणार आहेत. या फेरीनंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मात्र या सगळ्या गणितात एक मोठा ‘एक्स-फॅक्टर’ आहे. तो म्हणजे पाऊस.

सुपर-8 मध्ये एखादा सामना पावसामुळे रद्द झाला, तर पुढे काय होतं, हा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींना पडला आहे. यावर International Cricket Council (ICC) चा नियम आहे. जर एखादा सामना पावसामुळे झाला नाही आणि खेळ सुरूच होऊ शकला नाही, तर त्या दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जातो. अगदी ग्रुप स्टेजप्रमाणेच.

नियमांनुसार, एखाद्या सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान दोन्ही बाजूंनी पाच-पाच षटके टाकली जाणं आवश्यक असतं. पंच शक्य तेवढा वेळ थांबून सामना सुरू करण्याचा प्रयत्न करतात. पण सामना होऊ शकला नाही, तर सामना रद्द घोषित केला जातो आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जातो.

अशा वेळी कोणाला फायदा होतो?

पावसामुळे सामना रद्द झाला, तर कुणीही विजेता ठरत नाही आणि नेट रनरेटवरही त्याचा थेट परिणाम होत नाही. मात्र गुणतालिकेत एक-एक गुण मिळाल्यामुळे त्या संघाला फायदा होतो, ज्याचा नेट रनरेट आधीच चांगला असतो. म्हणूनच सुपर-8 मध्ये प्रत्येक संघ प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो. कारण उद्या पावसामुळे एखादा सामना रद्द झाला, तर नेट रनरेटमुळेच सेमीफायनलचं तिकीट मिळू शकतं.

यंदा सामने भारत आणि श्रीलंका या दोन देशांत खेळले जात आहेत. श्रीलंकेतल्या ग्रुप स्टेजमध्ये आधीच काही सामने पावसामुळे अडचणीत आले होते. कोलंबोमध्ये सतत झालेल्या पावसामुळे आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना होऊ शकला नव्हता. परिणामी, दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला आणि झिम्बाब्वेला सुपर-8 मध्ये प्रवेश मिळाला.

आता सुपर-8 मधील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं सांगितलं जात आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याबाबत हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ICC चा हा नियम पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, सुपर-8 सामने 21 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून 1 मार्चपर्यंत चालणार आहेत. या नऊ दिवसांत एकूण 12 सामने खेळले जाणार आहेत. टीम इंडिया आपला पहिला सुपर-8 सामना 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. 4 आणि 5 मार्चला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर 8 मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT