न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या धरतीवर विश्वचषक 2024 च्या अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी पार करताना भारताने सराव सामन्यात बांगला देशवर 60 धावांनी आरामात विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाज करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 182 धावा केल्या. त्यानंतर बांगला देशला 122 धावांत गुंडाळले. या सामन्यात ऋषभ पंतने (32 चेंडूंत 53) केलेली फटकेबाजी आणि हार्दिक पंड्याचा अष्टपैलू खेळ (23 चेंडूंत 40 धावा आणि 1 विकेट) या गोष्टी भारतासाठी शुभसंकेत ठरल्या.
न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगला देशची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने आपल्या दोन षटकांत दोन विकेटस् घेतल्या. त्याने डावाच्या चौथ्या चेंडूवर सौम्या सरकारला शुन्यावर बाद केले. त्याने ऋषभ पंतकडे झेल दिला. त्यानंतर पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लिट्टन दासचा (6) त्रिफळा उडवला. त्यानंतर बांगला देशचा कर्णधार नजमूल शांतो हुसेनही शुन्यावर बाद झाला. अवघ्या 41 धावांत त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
यानंतर मात्र शाकिब अल हसन आणि महमदुल्लाह यांनी डाव सावरला. दोघांनी भारतीय गोलंदाजीचा सावधपणे मुकाबला केला; परंतु आवश्यक धावगती त्यांना राखता आली नाही. 40 धावा केल्यानंतर महमदुल्लाहने रिटायरमेंट घेतली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने साकिबला (28) बाद केले. शिवम दुबेने शेवटच्या षटकांत 2 विकेटस् घेतल्या. बांगला देशच्या 20 षटकांत 9 बाद 122 धावा झाल्या.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांगला देशला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. विराट कोहली नुकताच अमेरिकेत दाखल झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. भारताने सराव म्हणून एक वेगळा प्रयोग केला. कर्णधार रोहित शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली, पण सॅमसनला मोठी खेळी करता आली नाही तो 1 धावावर तंबूत परतला. ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी करून विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. इतर फलंदाजांचा सराव व्हावा, या हेतूने पंतला निम्म्यातून तंबूत परतावे लागले. तो 32 चेंडूंत 53 धावा करून नाबाद परतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने स्फोटक खेळी केली. त्याने 23 चेंडूंत 40 धावा कुटल्या. त्याने डावाच्या सतराव्या षटकात षटकारांची हॅट्ट्रिक केली. आयपीएलमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करत असलेल्या पंड्याची ही खेळी म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी सुखद धक्काच म्हणावा लागेल.
या दोघांशिवाय भारताकडून रोहित शर्मा (23), सूर्यकुमार यादव (31), शिवम दुबे (14) आणि रवींद्र जडेजाने नाबाद (4) धावा केल्या. हार्दिकने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. भारताने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 182 धावा केल्या. बांगला देशकडून 8 गोलंदाजांनी सराव केला.