India Semifinal Opponent T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सुपर-8 फेरीत ग्रुप-1 मधून दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी आणि मजबूत नेट रनरेटच्या जोरावर त्यांनी गटात अव्वल स्थान पटकावले. आता या गटातून दुसरी सेमीफायनलिस्ट टीम कोण असणार, याचा फैसला 1 मार्च रोजी कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या सामन्यात होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन सामन्यांनंतर भारताच्या खात्यात 2 गुण आहेत. वेस्ट इंडिजकडेही तितकेच गुण आहेत. त्यामुळे जो संघ हा सामना जिंकेल, तो 4 गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर राहून सेमीफायनलचे तिकीट पक्के करेल. भारताने कोणत्याही फरकाने विजय मिळवला, तरी उपांत्य फेरी गाठणे शक्य आहे. पराभव झाल्यास मात्र भारताचा प्रवास येथेच थांबेल. त्यामुळे हा सामना जणू ‘क्वार्टर फायनल’च आहे.
जर भारताने वेस्ट इंडिजवर मात करून ग्रुप-1 मधून दुसऱ्या क्रमांक मिळवला, तर सेमीफायनलमध्ये भारताचा सामना ग्रुप-2 मधील अव्वल संघाशी होईल. सध्या ग्रुप-2 मध्ये इंग्लंडने तीनही सामने जिंकून पहिले स्थान मजबूत केले आहे. त्यामुळे भारत पात्र ठरल्यास 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड अशी रोमांचक लढत पाहायला मिळू शकते.
2022 च्या टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा जर दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले, तर भारतासाठी तो बदला घेण्याची मोठी संधी आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडसारख्या मजबूत संघाशी भिडणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक, पण तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
सध्या सर्वांचे लक्ष 1 मार्चच्या सामन्याकडे लागले आहे. भारत सेमीफायनलमध्ये पोहोचतो का, आणि पोहोचल्यास इंग्लंडविरुद्धची लढत होते का, हे लवकरच स्पष्ट होईल. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत थरारक असणार आहेत.