स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 : टीम इंडियाचा विक्रमी 'विजयरथ'! ऑस्ट्रेलिया-साऊथ आफ्रिकेचे रेकॉर्ड्स मोडीत काढत भारताचा जागतिक विक्रम

२०२४ च्या विश्वचषकापासून आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेचा (USA) धुव्वा उडवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयासह टीम इंडियाने एक असा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे, जो यापूर्वी या स्पर्धेच्या इतिहासात कधीही घडला नव्हता.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्याच लढतीत अमेरिकेला पराभूत करून भारताने विजयी सलामी दिली. या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे, २०२४ च्या विश्वचषकापासून आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. सलग विजयांची ही मालिका आता एका नव्या विक्रमात रूपांतरित झाली आहे.

२०२४ मधील 'विजयरथ' अद्याप कायम

२०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. त्या वर्षी टीम इंडियाने सुरुवातीपासून अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नव्हता. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने जेतेपदावर नाव कोरले होते. त्यावेळी भारताने सलग ८ सामने जिंकले होते. आता तोच वारसा सूर्यकुमार यादवने पुढे चालवला असून, या वर्षातील पहिल्या सामन्यात अमेरिकेवर २९ धावांनी मात करून भारताने आपल्या विजयाचा सिलसिला कायम राखला आहे.

सलग ९ विजयांसह ऐतिहासिक कीर्तिमान

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सलग ९ सामने जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी २०२२ आणि २०२४ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने सलग ८ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेनेही २०२४ च्या विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत सलग सर्व सामने जिंकले होते, परंतु अंतिम सामन्यात त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता सलग ९ विजयांसह भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा 'सिरमौर' ठरला आहे.

पुढील लक्ष्य : नामिबिया आणि विजयाचे 'दशक'

भारतीय संघाकडे आता ही विजयी मालिका १० सामन्यांपर्यंत नेण्याची सुवर्णसंधी आहे. टी-२० विश्वचषकात सलग १० सामने जिंकणारा पहिला संघ बनण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताचा पुढील सामना गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता सलग १० वा विजय मिळवणे कठीण वाटत नाही. आता ही विजयाची मालिका कोठपर्यंत टिकते आणि भविष्यात कोणता संघ हा विक्रम मोडू शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT