मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (५ मार्च) मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, दोन्ही संघांच्या विद्यमान ताफ्यातील अशा ५ खेळाडूंवर नजर टाकूया, ज्यांनी भारत-इंग्लंड टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा कुटल्या आहेत.
आपल्या आक्रमक शैलीने सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेला इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने भारतांविरुद्ध आतापर्यंत १० टी-२० सामने खेळले असून १९ च्या सरासरीने १७१ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे.
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी अभिषेक शर्माकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, परंतु आतापर्यंत त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र, इंग्लंडविरुद्धची त्याची आकडेवारी थक्क करणारी आहे. त्याने केवळ ५ सामन्यांत ५५.८० च्या उत्कृष्ट सरासरीने २७९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवकडून या विश्वचषकात ज्या वादळी खेळीची अपेक्षा होती, तशी कामगिरी अद्याप झालेली नाही. मात्र, उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात चाहत्यांच्या नजरा त्याच्यावर असतील. सूर्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत १३ सामने खेळले असून २९.०८ च्या सरासरीने ३४९ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध त्याच्या नावावर एक शतक आणि एका अर्धशतकाची नोंद आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विश्वचषकात चेंडू आणि बॅट अशा दोन्ही विभागांत हार्दिकने अष्टपैलू छाप पाडली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या २० सामन्यांमध्ये हार्दिकने २९.५७ च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. यात त्याने तीन वेळा अर्धशतकी टप्पा ओलांडला आहे.
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर या यादीत अव्वल स्थानी आहे. चालू विश्वचषकात बटलरची बॅट अद्याप शांत असली, तरी भारताविरुद्ध त्याची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्याने भारतांविरुद्ध आतापर्यंत २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ३२.२० च्या सरासरीने ६४४ धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे.