मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या संजू सॅमसनने आपल्या बॅटचा तडाखा कायम राखत इंग्लंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. गुरुवारी ५ मार्च रोजी झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात सॅमसनने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८९ धावांची स्फोटक खेळी केली. जरी त्याचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने भारताला विजयाचा भक्कम पाया रचून दिला.
डावाच्या तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर संजू १५ धावांवर असताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने त्याचा एक साधा झेल सोडला. हे जीवदान इंग्लंडला अत्यंत महागात पडले. या चुकीचा वचपा काढत सॅमसनने पुढच्याच दोन चेंडूंवर आर्चरला ८८ मीटर लांब उत्तुंग षटकार आणि एक चौकार खेचून जखमेवर मीठ चोळले.
अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन (१८ चेंडूंत ३९ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूंत ९७ धावांची तुफानी भागीदारी केली. सॅमसनने अवघ्या २६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीतील भारतीय फलंदाजातर्फे नोंदवलेले दुसरे वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी युवराज सिंगने २००७ मध्ये २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
इतकेच नव्हे तर, संजूने बाद फेरीत ८९ धावा करून विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटने २०१६ च्या उपांत्य फेरीत याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध ८९ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील सामन्यात ९७ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या संजूने जिथून खेळ थांबवला होता, तिथूनच आज सुरुवात केली. विशेषतः जोफ्रा आर्चरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा त्याने खरपूस समाचार घेतला. वानखेडेच्या मैदानावर संजूने ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकार ठोकले. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला, तेव्हा संपूर्ण प्रेक्षागृहाने उभे राहून त्याला मानवंदना दिली.
संजूच्या ८९, शिवम दुबेच्या ४३ आणि इशान किशनच्या ३९ धावांच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला. ही भारताची टी-२० विश्वचषक इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
संजू सॅमसन: ८९ धावा (४२ चेंडू, ८ चौकार, ७ षटकार)
वेगवान अर्धशतक: २६ चेंडू (बाद फेरीतील दुसरे वेगवान भारतीय अर्धशतक)
भागीदारी: ९७ धावा (संजू आणि इशान किशन)
भारताची एकूण धावसंख्या: २५३/७
या सामन्यातील विजेता संघ रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. संजूच्या या 'बिग मॅच टेंपरामेंट'मुळे भारतीय चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.