पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी ( ९ जून) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जाणून घेवूया टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाने केलेल्या नव्या विक्रमांविषयी…
रविवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने-सामने होते. संपूर्ण क्रिकेटविश्वाचे या अटीतटीच्या लढतीकडे लक्ष वेधले आहे. क्रिकेट प्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच झालं. अत्यंत रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानवरील हा सातवा विजय ठरला आहे. आजपर्यंत टी-20 विश्वचषक स्पर्धेदिोन्ही संघांनी आठ सामने खेळले आहेत. त्यातील सात सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. T20 विश्वचषकातील कोणत्याही एका संघाविरुद्धच्या सामन्यातील सर्वाधिक विजय मिळण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर झाला आहे. कारण याबाबत टीम इंडियानेपाकिस्तान आणि श्रीलंकेला मागे टाकले. पाकिस्तानने T20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज विरुद्ध प्रत्येकी सहा सामने जिंकले होते. आता पाकिस्तानविरुद्ध सात सामने जिंकत टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकाच संघावर सर्वाधिक वेळा विजय मिळवणारा भारत हा एकमेव देश आहे.
टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्या असतानाही विजय मिळवला आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने केवळ ११९ धावांपर्यंतच मजल मारली होती. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानला 20 षटकांत 7 बाद 113 धावा करता आल्या. भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. यापूर्वी टी-२० विश्वचषक स्पर्धेत २०१४ मध्ये श्रीलंकेने चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. यापूर्वी टीम इंडियाने 2016 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर 139 धावांचे लक्ष्य ठेवत विजय मिळवला होता.
पाकिस्तानने टाॅस जिंकला. भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला १९ षटकांमध्ये केवळ ११९ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात दमदार झाली. 14व्या षटकात पाकिस्तानने तीग गडी गमावत ८० धावा केल्या होत्या. रिझवान-शादाब बाद झाले आणि सामन्याला कलाटणी मिळाली.. जसप्रीत बुमराह 19व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. 20व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने केवळ 11 धावा देत इमाद वसीमला तंबूत धाडले. बुमराह-अर्शदीप, सिराज आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाने 20 षटकांत ७ गडी गमावत ११३ धावा केल्या.
जसप्रीत बुमराह याने केवळ १४ धावा देत तीन बळी घेतले. बुमराह सामनावीर ठरला. आठ महिन्यांत बुमराहने आयसीसी टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात बुमराहने पाकिस्तानविरुद्ध १९ धावांत दोन बळी घेतले होते आणि तो सामनावीर ठरला होता.