पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar vs Virat Kohli : सूर्यकुमार यादव आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. मात्र, त्यानंतरही त्याच्या फलंदाजीची शैली अजिबात बदललेली नाही. निर्भयपणे फलंदाजी करणे हेच त्याचे बलस्थान आहे. सूर्याने ग्वाल्हेरमध्ये मोठी खेळी केली नसली तरी त्याची फलंदाजीची आक्रमकच राहिली. कदाचित यामुळेच तो एका रेकॉर्डमध्ये विराट कोहलीच्या अगदी जवळ पोहचला आहे. आता दिल्ली टी-20 सामन्यात सूर्या आणखी एक मोठी इनिंग खेळू शकेल का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वास्तविक, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 69 डावांमध्ये 2461 धावा केल्या आहेत. म्हणजेच त्याला 2500 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 39 धावांची गरज आहे. पुढील सामन्यात तो हा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनलमध्ये चार हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, परंतु जेव्हा त्याने या फॉरमॅटमध्ये 2500 धावा पूर्ण केल्या तेव्हा त्याने 73 सामने खेळले होते.
म्हणजेच सूर्यकुमार यादवने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 39 धावा केल्यास तो कोहलीइतकेच सामने खेळून तो 2500 धावा करू शकतो. कोहलीच्या आधीही अनेक खेळाडूंनी या फॉरमॅटमध्ये 2500 धावा केल्या आहेत. मात्र, या या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने स्फोटक खेळी खेळली. त्याने अवघ्या 14 चेंडूत 29 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन षटकार आणि दोन चौकार आले. पुन्हा एकदा दिल्लीच्या चाहत्यांना सूर्याकडून तुफानी खेळीची अपेक्षा आहे. मात्र, यावेळी त्याला विराट कोहलीची बरोबरी करण्यासाठी मोठ्या खेळीची गरज आहे.