नवी दिल्ली : महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ‘बीसीसीआय’च्या २०२६-२७ च्या देशांतर्गत क्रिकेट मोसमाच्या वेळापत्रकावर कडक शब्दांत टीका केली आहे. आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव घेण्यासाठी रणजी ट्रॉफी आणि फर्स्ट क्लास (रेड बॉल) क्रिकेटकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावसकरांनी केला आहे.
बीसीसीआयने सलग तिसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीचे दोन भागांत विभाजन केले आहे. पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान होईल, तर त्यानंतर १७ जानेवारी २०२७ पासून दुसरा टप्पा आणि नॉकआऊट सामने सुरू होतील.
रणजी ट्रॉफीच्या दोन टप्प्यांमधील दोन महिन्यांच्या गॅपदरम्यान ‘सय्यद मुश्ताक अली टी-२०’ (१४ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर) आणि ‘विजय हजारे ५० षटकांची स्पर्धा’ होणार आहे. या व्हाईट-बॉल स्पर्धांचा काळ थेट आयपीएल २०२७ च्या लिलावाच्या आसपास येतो, जेणेकरून फ्रँचायझींना खेळाडूंची निवड करणे सोपे जावे.
गावसकर म्हणाले, एखादी राष्ट्रीय स्पर्धा थांबवून मध्यंतरात पांढऱ्या चेंडूची स्पर्धा कशी काय घेतली जाऊ शकते? यामुळे रेड-बॉल क्रिकेटमधील खेळाडूंची लय आणि सातत्य नष्ट होते. रणजी ट्रॉफीला पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलवर लक्ष केंद्रित करून देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटकडे दुर्लक्ष करणे भविष्यात अत्यंत घातक ठरेल.