स्पोर्ट्स

Sunil Gavaskar | "आधी एक धाव..." : सलग दोनदा शून्यावर बाद झालेल्या अभिषेकला सुनील गावस्‍करांनी दिला मोलाचा सल्ला

कोणत्‍याही फलंदाजाने चांगल्या फॉर्मला गृहीत धरणे नेहमीच ठरते चुकीचे

पुढारी वृत्तसेवा

Sunil Gavaskar advises to Abhishek Sharma

मुंबई : टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असले, तरी टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज अभिषेक शर्माकडून धावांची आतषबाजी पाहायला मिळालेली नाही. आजारपणामुळे एक सामना मुकलेला अभिषेक अमेरिका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला. आता त्‍याच्‍या आक्रमक खेळण्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा परिस्थितीत, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अभिषेकला फॉर्ममध्ये परतण्यासाठी एक अत्यंत साधा सल्ला पण, मोलाचा सल्‍ला दिला आहे.

'आधी एक धाव काढ....'

'स्पोर्ट्स टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर म्हणाले, "अभिषेक शर्माला मी न मागता एक सल्‍ला देतो की, त्याने सुरुवातीला फक्त एक धाव काढण्यावर लक्ष केंद्रित करावे. धावफलक हलता झाला आणि धावताना पायांची हालचाल व्यवस्थित झाल्‍यानंतर तो आपले आक्रमक फटके खेळू शकतो. सुरुवातीलाच मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात विकेट गमावण्यापेक्षा पहिली धाव घेणे महत्त्वाचे आहे."

फलंदाजाने चांगल्या फॉर्मला गृहीत धरणे नेहमीच ठरते चुकीचे

"अभिषेक आत्मविश्वासाने खेळत आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते, तो चांगल्या लयीत आहे. मात्र, चांगल्या फॉर्मला गृहीत धरणे चुकीचे ठरेल. अनेक फलंदाज सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात, पण एकदा सेट झाल्यावर मगच आपल्या कक्षेबाहेर जाऊन खेळणे योग्य ठरते, असेही गावस्‍करांनी म्‍हटलं आहे.

प्रतिस्पर्धी संघांची रणनीती आणि आव्हाने

२०२५ च्या आशिया चषकात अभिषेकने ७ सामन्यांत तब्‍बल ३१४ धावा केल्‍या होत्‍या. मात्र, आता विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघ त्याच्याविरुद्ध पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. अमेरिकेविरुद्धच्‍या सामन्‍यात डीप कव्हरला तर पाकिस्तानविरुद्ध मिड-ऑनला झेलबाद झाला होता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्याच्यासाठी विशेष क्षेत्ररक्षण लावून त्याला जाळ्यात ओढले होते.

संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा

अभिषेकच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच, फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी मात्र त्याचे समर्थन केले आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोटक म्हणाले, "अभिषेकच्या फॉर्मबाबत विनाकारण जास्त विश्लेषण करण्याची गरज नाही. टी-२० फॉरमॅट हा जोखमीचा खेळ आहे. कधीकधी १० चेंडूत ३० धावा करणेही तितकेच महत्त्वाचे असते. तो चांगल्या लयीत असून त्याची रणनीती स्पष्ट आहे. खेळाडूवर जास्त दडपण आणणे योग्य नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT