Sreesanth Slapgate scandal: हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील २००८ च्या आयपीएल हंगामात थप्पड प्रकरण खूप गाजलं होतं. या प्रकरणावर पडदा देखील पडला होता. श्रीसंतने दिग्गज मानल्या गेलेल्या हरभजनला मोठ्या मानाने माफ देखील केलं होतं. मात्र अजून हे प्रकरण संपलेलं नाही. श्रीसंतच्या नव्या खळबळजनक दाव्यावरून तरी हरभजनच्या मानगुटीवरून याचं भूत अजून उतरलं नसल्याचं दिसून येत आहे.
एस श्रीसंतने थप्पड प्रकरणाची जाहिरात केली अन् त्यातून जवळपास एक कोटी रूपये कमवल्याचा आरोप केला आहे. या नव्या दाव्यामुळं पूर्वाश्रमीचे आपचे आणि आता भाजपवासी झालेले खासदार हरभजन सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हरभजन सिंगने भर मैदानात एस श्रीसंतला थप्पड मारण्याच्या घटनेला आता जवळपास १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांनी देखील माफी मागून आणि माफ करून हे प्रकरण गाडून टाकलं होतं. मात्र हरभजनने हे गाडून टाकलेलं भूत पुन्हा बाहेर काढलं त्यानं याबाबत जाहिरात करून पैसे कमवण्याचा प्रयत्न केला. यानंतर श्रीसंतने जरी मोठ्या मनानं त्याला माफ करून टाकलं असलं तरी याचे व्यावसायीकरण करणाऱ्या हरभजन सोबतचं नातं कायमचं संपवलं होतं.
श्रीसंतने मल्याळम वृत्तसंस्था मातृभूमीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'मी मुलाखतीत कधीही भज्जीसोबत बोललो नाही. हे पहिल्यांदाच घडलं. आता आतापर्यंत आमच्यात काही प्रॉब्लेम नव्हता. मात्र त्याने थप्पड प्रकरणी पुन्हा एकदा जाहिरात केली. त्याने त्यातून ८० लाख ते १ कोटी रूपये कमवले. त्यानंतर त्यानं मला फोन करून या जाहिरातीची स्टोरी इन्स्टाग्रामवर ठेवण्यास सांगितलं. मी त्याला सांगितलं की मी माफ केलं मात्र मी विसरलेलो नाही. जर तुमच्याबद्दल काही चुकीचं घडलं तर तुम्ही माफ करा मात्र ते कधी विसरू नका. जर तुम्ही विसरला तर ते पुन्हा तशाच प्रकारची गोष्ट करतील. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हरभजन सिंग आहे. यात काहीच शंका नाही.'
श्रीसंतने हरभजनच्या बाबतीत अनेक दावे केले आहेत. तो म्हणतो, 'माझे त्या व्यक्तीसोबत कोणतेही संबंध नाहीयेत. मी त्याला भाऊ म्हणून हाक मारत होतो. मात्र गेल्या एक दोन महिन्यात त्याने ती जाहिरात केली आणि आता मी त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे.
श्रीसंत पुढे म्हणाला, 'माझ्या पालकांनी मला माफ करण्याचं मात्र झालेली घटना न विसणे हे शिकवलं आहे. माझी त्याच्याविरूद्ध कोणती तक्रार नाही किंवा मला त्याची गरज देखील नाही. देवाची कृपा त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर राहू दे. अनेक मुलाखतीत अश्विन सोबतच्या मुलाखतीत देखील तो माझ्या मुलीबाबत बोलतो. लोकांना वाटतं की अरे वा किती छान व्यक्ती आहे. तो असेलही छान व्यक्ती मात्र माझ्यासाठी मी भारताकडून खेळत असताना आणि आताही तो नाटकी व्यक्ती आहे. तो अशी नाटकं करतोय की जी श्रीसंतला मान्य नाहीत.'