चेन्नई; वृत्तसंस्था : भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ‘बीसीसीआय’च्या समालोचन पॅनेलचा निरोप घेतला. मात्र, निवृत्तीची घोषणा करतानाच त्यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे वादळ निर्माण झाले आहे. त्यांनी थेट वर्णभेदाचे आरोप करत क्रिकेट प्रशासनातील काळ्या बाजूवर बोट ठेवले आहे.
वर्णभेदाचा गंभीर आरोप
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये शिवरामकृष्णन यांनी खळबळजनक दावे केले. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, तुमचे म्हणणे बरोबर आहे, माझ्यासोबत रंगावरून भेदभाव झाला. इतकेच नव्हे तर, टीव्ही प्रॉडक्शनमधील अंतर्गत गोष्टी बाहेर आल्यास चाहत्यांना धक्का बसेल आणि बीसीसीआयचाही विश्वास बसणार नाही, असा इशारा त्यांनी एका डिलीट केलेल्या पोस्टमध्ये दिला.
रवी शास्त्रींवर निशाणा
शिवरामकृष्णन यांनी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही थेट हल्ला चढवला. शास्त्री प्रशिक्षक असताना मला टॉससाठी (नाणेफेक) एकदाही संधी देण्यात आली नाही, मात्र नवख्या समालोचकांना खेळपट्टीचा अहवाल देण्याची संधी सहज मिळत होती, अशी सल त्यांनी बोलून दाखवली.