पुढारी ऑनलाईन डेस्क | Shafali Verma : काल (दि.23) झालेल्या नेपाळविरूद्धच्या सामन्यात शेफाली वर्माने केलेल्या धुवाँधार खेळीच्या जोरावर 82 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने विजयाची हॅटट्रिक साधत महिला आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सामन्यात फलंदाजीमध्ये महत्वाची खेळत शेफाली वर्माने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. जाणून घेवूयात त्याबद्दल.
नेपाळविरूद्धच्या सामन्यात 81 धावांची खेळी करत शेफाली वर्माने स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले. स्पर्धेत तिने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 40 धावा तर, यूएईविरुद्धच्या सामन्यात तिने 37 धावांची खेळी केली होती. परंतु, तिला या धावसंख्येचे रूपांतर अर्धशतकात करता आले नव्हते. या सामन्यात तिने संयमी आणि आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत अर्धशतक झळकावले. तिने नेपाळविरूद्धच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 12 चौकार आणि 1 षटकारच्या जोरावर 81 धावांची खेळी केली.
नेपाळविरूद्ध दमदार फटकेबाजी करत शेफालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटीमध्ये तिने पाच सामन्यांमध्ये 567 धावा तर, एकदिवसीय सामन्यात 26 सामन्यात 588 धावा आणि 79 टी-20 सामन्यांमध्ये तिने 1869 पेक्षा जास्त धावा केल्या. शेफालीचे हे टी-20 मधील नववे अर्धशतक आहे. शेफालीच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाची दमदार सुरुवात झाली. दलियान हेमलताने तिला मोलाची साथ दिली. या सामन्यात शेफालीने 81 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि एक षटकार लगावला. 16व्या षटकाच्या तिसऱ्या बॉलवर ती बाद झाली.
भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना नेहमी शेफालीसोबत डावाची सुरुवात करते. मात्र, या सामन्यात मानधनाने वेगळा निर्णय घेतलेला आपल्याला पहायला मिळाला. नेपाळविरूद्धच्या सामन्यात हेमलता शेफालीसोबत सलामीला आली.
सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या जोरावर भारताने नेपाळविरूद्ध तीन विकेट गमावून 178 धावा करत विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले. यावेळी फलंदाजीमध्ये शेफालीला हेमलताने महत्वाची साथ दिली. तिने आपल्या खेळीत 42 बॉलमध्ये 47 धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये नेपाळच्या स्मीता राणा मगरने 2 तर कबिता जोशीने 1 विकेट घेतली.
भारताने दिलेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेपाळी संघाची सुरुवात खराब झाली. फलंदाजीत ठराविक अंतराने नेपाळचा संघ विकेट गमावत राहिला. फलंदाजीमध्ये समझा खडकाने 7 चेंडूत 7 धावा केल्या. तिच्याशिवाय कविता कुंवरने 6, कर्णधार इंदू बर्माने 14, सीता राणा मगरने 18, रुबिना छेत्रीने 15, कविता जोशीने 0, पूजा महातोने 2, डॉली भट्टाने 5, काजल श्रेष्ठने 5 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने 3 बळी घेतले. भारताकडून गोलंदाजीमध्ये अरुंधती रेड्डी आणि राधा यादव यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. तसेच रेणुका सिंह ठाकूर यांनी 1 ठार घेतला.