अहमदाबाद : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची झंझावाती खेळी साकारून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या खेळीसह संजू टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जगातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
या ऐतिहासिक सामन्यात संजू सॅमसनने सुरुवातीला अवघ्या ३३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर अतिशय संयत व आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. संजू आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना ८९ धावांवर बाद झाला. मात्र, या धावांच्या जोरावर त्याने २०१४ च्या विश्वचषक फायनलमध्ये विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ७७ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. आता भारतासाठी विश्वचषक फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान संजू सॅमसनच्या नावे जमा झाला आहे.
संजू सॅमसन केवळ भारताचाच नव्हे, तर जागतिक स्तरावर टी-२० विश्वचषक फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सचा (८५* धावा, विरुद्ध इंग्लंड) आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा (८५ धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया) विक्रम मोडीत काढला आहे.
८९ संजू सॅमसन न्यूझीलंड
८५* मार्लन सॅम्युअल्स इंग्लंड
८५ केन विल्यमसन ऑस्ट्रेलिया
७८ मार्लन सॅम्युअल्स श्रीलंका
७७* मिचेल मार्श न्यूझीलंड
संजू सॅमसनने आपल्या ४६ चेंडूंच्या या खेळीत ८ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार मारले. १९३.४८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे निस्तेज केले. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताने विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.